Tuesday 25 December 2012

माझा रविवार ...

" उद्या रविवार आहे, मी उद्या उशिरा उठणार.........!!"
        हि माझी दर शनिवारी रात्रीची ठरलेली घोषणा...आणि उद्या रविवार म्हणजे शनिवारी रात्री उशिरा पर्यंत जागायला काहीच हरकत नसते. मग रात्री उशिरा झोपल्यावर सकाळी मस्त ९-१० वाजता उठायचं ( रोजची सकाळी लवकर उठायची घाई नाही!).
        उठल्यावर मस्त वाफाळती कॉफी करायची आणि आरामात पेपर वाचत बसायचं.रविवार म्हणजे सगळ्याच वृत्तपत्रांना वाचनीय पुरवण्या असतात. पेपर पूर्ण वाचून झाल्यावर मग अंघोळ! तोपर्यंत नाश्ता काय करायचा हे ठरलेल असतच. मग अंघोळीनंतर सहपरिवार नाश्ता होतो आणि सोबत गप्पा असतातच!
मग रविवारच्या ठरलेल्या कार्यक्रमांना सुरुवात होते.......
        रविवार म्हणजे मी एखाद आवडत चित्र शोधून त्याची रांगोळी काढणार.( मी या रांगोळ्या अगदी दर रविवारी काढते. घरातच, कारण या मुळे रांगोळी काढायचा छान सराव होतो).माझी रांगोळी पूर्ण होई पर्यंत आईने जेवणाचा मेनू ठरवलेला असतो. मग तिच्यासोबत जेवण बनवायचं आणि सगळ्यांनी सोबत जेवायचं.
आणि मग मस्त दुपारची 'वामकुक्षी' घ्यायची!
       या वामकुक्षीनंतर पुन्हा वाफाळती कॉफी आणि सोबत एका नवीन पुस्तकाची सुरुवात जे मग पुढच्या रविवारपर्यंत वाचून होत. मग संध्याकाळी एखाद्या आप्तांच्या घरी भेट द्यायची.नाहीतर मग चित्रकलेची वही घेऊन छान चित्र काढायचं...
        रात्री "रविवार स्पेशल'' मेनुची तयारी करायला आईला मदत करायची आणि सगळ्यांनी सोबत या रविवार स्पेशल मेनूचा आनंद लुटायचा......
         हा माझा रविवार मला माझ्या छंदांसाठी खूपच छोटा वाटतो. कपाटाची, खणाची साफ-सफाई, पुस्तक वाचन, कुकिंग आणि बरच काही...  आपल्या सगळ्यांचेच काही ना काही छंद असतात जे या धकाधकीच्या जीवनात पूर्ण कारण शक्य होत नाही. पण मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा रविवार जसा आपल्या जिवाभावाच्या मित्रा सारखा आपल्या सोबत असतो.
          तुम्हाला आठवत का? आपण लहान होतो तेव्हा आपण तेच करायचो जे आपल्याला वाटायचं..... कुठलीच जबाबदारी नसायची तेव्हा प्रत्येकच दिवस रविवार होता! तस आता शक्य नसल तरी रविवारी आपण आपल्या छंदांना, स्वप्नांना वेळ देऊ शकतो......
        रविवारी जर आपण आपल्या छंदांना वेळ दिला तर आपला पूर्ण आठवडा बघा कसा आनंदात आणि फ्रेश मूड मध्ये जातो.
       तुमचा रविवार सुद्धा असाच स्पेशल असेल ना? काय करता तुम्ही रविवारी? कसा असतो तुमचा रविवार?

 माझ्या रविवारच्या उपक्रमांचे काही फोटो.......





      


























Thursday 20 December 2012

माणसाची परत अश्मयुगाकडे वाटचाल ...

        बिहारमधील खगडिया जिल्ह्यात मुख्याध्यापकाने पाचवीतील विद्यार्थिनीवर बलात्कार केला, नवी दिल्लीतील स्कूल बस चालक भावाने सोळा वर्षाच्या चुलत बहिणीवर अत्याचार केला,महाराष्ट्रात दोन प्राध्यापकांनी सहकारी महिला प्रध्यापिकांची छेड  काढली. या घटनांमधून तुम्हाला सुशिक्षित भारताचे दर्शन होते का?
        दिल्लीतल सामुहिक बलात्कार प्रकरण अजूनही ताजच आहे. झाल्या प्रकरणाची सविस्तर माहिती तशी आपल्या सगळ्यांनाच आहे आणि अस का घडल किंवा अस का घडत? हा प्रश्नसुद्धा आपल्या सगळ्यांनाच पडलाय. पण या प्रश्नच उत्तर मात्र कोणाकडेच नाही...
         पिडीत मुलीला न्याय मिळावा म्हणून संसदेतल्या सगळ्या स्त्रियांनी आपल्या मतावर ठाम राहून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हि मागणी केली.हि एक चांगली गोष्ट आहे आणि या घटनेमुळे सगळा देश जागा होऊन या पिडीत मुलीच्या मागे उभा आहे हि सुद्धा.
         पण हे अस का घडल? हा प्रश्न उरतोच.अस घडल कारण अशा घटना  घडल्यावरच भारतातले लोक जागे होतात!
          आपल्याला लहान पणापासून सांगण्यात येत कि बाईची अब्रू म्हणजे काचेच भांड असते. ते काचेच भांड फुटु नये. याची काळजी फक्त स्त्रीनेच घ्यायची ? समाजाची यात काहीच जबाबदारी नाही? कायद्याची काहीच जबाबदारी नाही?
          जर समाज सतर्क असेल, कायद्यात अशा आरोपींना/गुन्हेगारांना कठोर शिक्षा असेल तर का होईल अस? आता हे प्रकरण अजून मिटलेल नाही तर इकडे  दुसरी प्रकरण पुन्हा सुरूच आहेत! पटनात एका तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या  मुलीचा बलात्कार करून तिचा खून केला तर कोल्हापूरमध्ये प्रेमाला नकार दिला म्हणून मुलीच्या अंगावर तेजाब टाकण्यात आले...माणूस इतका राक्षसी कसा वागू शकतो? जनावर सुद्धा लाजतील अशी कृत्य करण्याचे विचार माणसाच्या मनात कसे येतात? अस कृत्य करताना एकाच्या सुद्धा मनात कस येत नाही कि हे चुकीच आहे? एकाचीही सद्सद विवेक बुद्धी जागरूक नसावी काय? माणसाची परत अश्मयुगाकडे वाटचाल सुरु झाली आहे काय? मग यांना शिक्षाही अघोरीच का नको?शिवाजी महाराजांचा राज्य कारभार आपण आदर्श मानतो,त्यांनीही महिलेवर अत्याचार करणाऱ्या पाटलाचे हात पाय छाटून टाकले होते,हे विसरायला नको.बालात्कार्यांना फाशी हीच योग्य आणि त्वरित शिक्षा व्हायला हवी!
            अशा घटना भारतातच जास्त घडतात. याला कारण कायदा ( आणि समाजसुद्धा) आणि त्यातल्या किती घटना आपल्या पर्यंत पोहोचतात? रोजच्या वर्तमानपत्रात तर रोज किमान ४-५ तरी बलात्काराच्या बातम्या असतातच! यामध्ये दोन वर्ष वयाच्या बालिके पासून ६० वर्षाच्या आज्जीपर्यंत पिडीत महिला असतात.बालात्कार्यांना वयाचाही विधिनिषेध नसावा का? शरमेने आपली मान खाली जाते.अरुणा शानबाग हेही एक असेच ज्वलंत उदाहरण. दिल्लीच्या केस मधील मुलीची अरुणा शानबाग होउदेउ नका. गुन्हेगारांना ताबडतोब व कठोर शासन झाले तरच पुढच्यांना कायद्याची भीती वाटेल.
            अस काही झाल कि नेते मंडळी जाऊन पीडितांना भेटून येतात.काही रक्कम "भरपाई" म्हणून देतात झाल! कोर्टात दाखल केलेला गुन्हा वर्षानु वर्ष चालूच राहतो...आणि पिडीत याचा मानसिक ताण आयुष्यभर सहन करतो.
            कुठे चाललोय आपण? विकसनशिलतेकडून विकसित देशाकडे कि  विकसनशिलतेकडून अविकसित देशाकडे? भारत २०२० मध्ये 'महासत्ताक' होण्याची स्वप्न पाहतोय ना आपण? असा असेल महासत्ताक भारत? जिथे स्त्री असुरक्षित आहे, भ्रष्टाचार बोकाळलाय, आणि कायदे धाब्यांवर बसवलेत! भरदिवसा खून होतात, कायदा हातात घेतला जातो, पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी इच्छा असूनही साक्षीदार पुढे येत नाहीत.
            असच जर सुरु राहणार असेल तर मग मला एक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच विचारावासा वाटतो कि अशा या लोकशाहीपेक्षा इंग्रजांनी आपल्यावर केलेलं राज्य काय वाईट होत? हातातल्या काठीला सोन बांधून फिरलं तरी ते चोरी होण्याची भीती तरी तेंव्हा नव्हती .........
          








Friday 14 December 2012

"भिकाऱ्या सारख जेवण.............."

 


                          "Eat breakfast like a king, lunch like a prince and dinner like a pauper!" 
            मी कशाबद्दल म्हणतेय ते समजल असेलच.रात्रीच जेवण.आजीच्या भाषेत जवळ जवळ लंघन आणि आईच्या भाषेत थोडस चौम्यौ !
            काल रात्री  एका मैत्रिणीशी फेस टू  फेस तोंडाला फेस येई पर्यंत गप्पा चालल्या होत्या,शेवटी ती म्हणाली "चल बाय .....जेवण करायचं !" मेनू विचारला तर म्हणाली "फ्र्यान्की  केलीय "
          आईला सांगितलं तर ती तिच्या जुन्या आठवणीत रमली. मजा होती हं त्यांच्या वेळी(२५-३०वर्षांपूर्वी)-कितीतरी वस्तू ,शब्द, गोष्टी तर आपल्याला माहितच नाहीत .तुम्हालाही ऐकून मजा वाटेल.चला तर मग पाहूयात काय म्हणाली आई ते .........................
            "मऊ मुगाची पिवळी गरमागरम खिचडी त्यावर तुपाची धार (बुटली मधून),सोबत लोणच,पापड (नागली, उडीद,ज्वारी,तांदूळ,पोह्याचा नाहीतर तांदळाचा)   आमच्या लहानपणी वडील आणि आम्ही मुल सकाळी ११ ला जेऊन बाहेर पडायचो ,संध्याकाळी पोहे,सांजा,भेल असा काहीतरी नाश्ता व्हायचा.मग खेळ,शुभंकरोती,अभ्यास आणि ८ वाजता रात्रीच जेवण. यापेक्षा जास्त उशीर नाही.
           ह्या गोष्टी मी काही ६०-७० च्या दशकातल्या नाही सांगत,तर त्या आहेत ८०-९० साल च्या. रात्रीच्या जेवणात पोळी भाजी फारच कमी वेळा असायची (जवळ जवळ नाहीच) भात, खिचडी असे प्रकार जास्त.पण त्यात विविधता खूप. म्हणजे  नुसता भात म्हटलं तरी मुगाची आमटी भात (तूरीच वरण रात्रीच खायचं नाही) पातळ पिठल भात,खिचडी तर अनेक प्रकारची पिवळी, साधी, मुगाची खिचडी, कधी तूप टाकून तर कधी जीरे, मोहरी, लसुन, मिरचीची तेलातली कुरकुरीत फोडणी टाकून,अख्या मुगाची फोडणीची तिखट खिचडी,मसाले भात,बाजरीची खिचडी . सगळे भाताचे प्रकार असूनही प्रत्येकाची वेगळी चव.
               भात नसेल तर भाकरी. थंडीच्या दिवसात बाजरीची,उन्हाळ्यात ज्वारीची आणि खावीशी वाटेल तेव्हा तांदळाची (हि तर अगदी गरम-ताव्यावरचीच खायची) पिठल भातासाठी  एकदम पातळ,भाकरीसाठी थोड घट्ट ,कधी लसणाच्या फोडणीच तर  कधी कांद्याच्या फोडणीच आधणाच. फोडणीची खिचडी किंवा बाजरीची खिचडी असेल तर कढी असायची सोबत.
              मोसमानुसार पण पदार्थात बदल व्हायचा. म्हंजे थंडीच्या दिवसात,पावसाळ्यात शेंगोळे (हुरड्याच्या पीठाचे) चीकोल्या, घावन (बेसनाचे-तांदळाच्या पीठाचे),थालीपीठ असे पदार्थ बनायचे.तर उन्हाळ्यात गुळाच्या पाण्यातल सातूच पीठ, दुध शेवया, आंब्याचा रस शेवया, जेवणात २ घास कमी खाऊन  टरबूज खरबूज खायचं.
              तोंडी लावायला दही, वेगवेगळी लोणची, कार्हळाची,खोबऱ्याची,शेंगदाण्याची चटणी,तळलेली ताकातली मिरची,पापडा  सारख्या खारोड्या.........................अगदी तोंडाला पाणी सुटत अजूनही आठवल तर.
              परत ज्याला भूक नसेल त्याला खायचा आग्रह नाही , लंघन करावस वाटल तर फक्त दुध घ्यायचं थोडस झोपताना.का जेवली नाही म्हणून हजार चौकश्या नाही. 
              पण आजकाल जेवायला लोकांना ९-१० वाजतात. हि पण वेळ कायम पाळलीच जाईल अस नाही सगळे सोबतच जेवतील याचीही खात्री नाही. जेवायला काय तर नुडल्स,पास्ता ,फ्रान्की ,  फ्राईड राईस -चायनीज नाहीतर इटालियन असले पदार्थ.आपल्या शेवया, शेंगोळी हे नुडल्स पेक्षा कधीही चांगले, चीकोल्या म्हणजे इंडिअन पास्ताच ना?आणि आपले भाताचे प्रकार त्या फडफडीत फ्राईड राइसला हरवतील.मऊ भाताचा वेगळा तांदूळ तर खिचडीचा वेगळा तांदूळ  म्हणजे तांदुळाच्या चवीतही वैविध्य आहे आपल्याकडे.
             आणि अजून एक गमत सांगू का? श्रावणातल्या सोमवारी  आमची शाळा लवकर म्हणजे ४लाच सुटायची-उपवास असायचा ना!तर हा उपवास संध्याकाळी लवकर सोडायचा असतो -६ वाजताच. आई लवकर स्वयपाक करायची-  वरण भात भाजी पोळी उपास सोडायला. आम्ही सगळे जण संध्याकाळी ६लाच जेवायचो.काय मस्त वाटायचं- बाहेर पाऊस पडत असायचा आणि घरात आम्ही गरम वाफाळत जेवण जेवायचो.
             आता तर श्रावणी सोमवारी शाळाही लवकर सुटत नाहीत आणि उपवास हि . छे, फार वाईट वाटत कि तुम्हाला हि  मजा  चाखता येत नाही म्हणून."
                   काय, ऐकल न मित्रानो काय धमाल होती आईच्या काळात,पापडाचे प्रकार, चटण्यांचे प्रकार किती होते पहिले न. शिवाय तळण  नाही मळणं नाही. कमी तेलातले पदार्थ. नाही तर आपण खातोय एकच एक उडदाचा पापड आणि कैरीच रेडीमेड लोणच . मी उद्या आईला फिकी खिचडी आणि फोडणीच तेल करायला सांगितलय.मलाही खायचाय तो कुरकुरीत लसुन. तुम्ही पण सांगणार ना तुमच्या मम्मीला?

Monday 10 December 2012

एक पत्र तुमच्यासाठी..

                                                                          ।। श्री ।।
प्रिय,
मित्र आणि मैत्रिणींनो,
         आज तुम्हाला सगळ्यांना पत्र लिहिण्याची इच्छा झाली.म्हणून पत्र लिहायला बसलेय.आपल्यासाठी अनभिज्ञ आहे हा पर्याय, म्हणून हा खटाटोप.आता तुम्ही म्हणाल कि एवढीच आठवण येत होती, तर फोन करायचा, एस.एम.एस.पाठवायचा. पत्राची काय गरज ? हो, आहे गरज.... म्हणूनच पत्र लिहायचं ठरवल.
         आपण लिहायचो ना शाळेत असताना,तसच...खोट खोट का होईना पण लिहायचो कि नाही? म्हंटल आता खर खर लिहू.
         मज्जा यायची ना अस खोट  खोट पत्र लिहायला .कधी घरी, कधी मित्र-मैत्रिणींना. तेव्हा वाटायचं कि अस खर खर पत्रही लिहाव कधीतरी....पण मग आपण मोठे होत गेलो,शाळेतल्या त्या खोट्या पात्रांशी असलेला संबंध पण तुटला. आता कॉलेज मध्ये आपण लिहितो व्यावसायिक पत्र, पुस्तकांची मागणी करणारे किंवा मग समारंभाचे आमंत्रण देणारे. तेही खोटेच.माझी आई सांगते कि पूर्वी नळाला जसे दिवसातून दोनवेळा पाणी यायचे, तसाच पोस्टमन सुद्धा दिवसातून दोनदा यायचा! हि गोष्ट तशी फार जुनी नाही, २० वर्षांपूर्वीपर्यंत असच होत. मग आपण मोठे होत गेलो तस फोन, एस.एम.एस यांच्याशी जवळचा संबंध आला आणि मनाच्या कोपऱ्यात असलेले, ते पत्रसुद्धा नाहीसे झाले....आणि नात्यांमधली जवळीक सुद्धा!
       आता आलीच आठवण तर टाकायचा एखादा मेसेज, इमेल किंवा करायचा फोन...हेच करतो न आपण आता?पण यात कुठलीच भावनिक गुंतागुंत नसते.
       पूर्वी जर पत्र पाठवायचे असेल किंवा कुणाचे पत्र आले तर घरात किती उत्साह दिसायचा ! पत्र म्हणजे नुसते कागदावरचे शब्द नसायचे ते... त्यातून खूप काही व्यक्त व्हायचं, प्रेम, आदर, नाती सगळच व्यक्त व्हायचं ! मोठ्यांच्या साष्टांग नमस्कारापासून तर किलबिल पार्टीच्या गोड-गोड पाप्या पर्यंत सगळ असायचं या पत्रांमध्ये. आता आपण पत्रापेक्षा जास्त कुरिअरचा, इमेलचा वापर करतो..कोणी गेलय का कधी आपल्या पैकी पोस्ट-ऑफिस मध्ये ? लिहिलंय का कधी आंतरदेशीय पत्र?
        पूर्वी पत्र म्हणजे आपल्या भावना व्यक्त करायचं साधनच होत! आपल्या माणसांना लिहिलेलं पत्र हे ठरवून नाही लिहील जायचं, त्यावेळी जे सुचेल जसे सुचेल तेच पत्रात उतरवायचे लोक आणि हो, ह्या पात्रांचे महत्वही खूप असायचं बरका !
        पोस्टमनने पत्र हातात दिल्यावर जर ते वरच्या कोपऱ्यात फाटलेले असेल तर वाचायच्या आधीच समजायचे कि पत्रात काहीतरी दु:खद घटना लिहिलेली आहे. किंवा जर पत्रावर हळद-कुंकू शिंपडलेले असेल तर कोणाचे तरी लग्न ठरले अस समजायचं.
        अगदी सण-समारंभांना पण लोक आप्तांच्या भेटकार्ड, शुभेच्छा पत्रांची आवर्जून वाट पहायचे.आता तसे लोक पण नाहीत आणि पत्रसुद्धा नाहीत..
        आज हे अस ब्लॉगवर का होईना पत्र लिहिताना त्या जुन्या शाळेत लिहिलेल्या खोट्या पात्रांची आठवण झाली...तुम्हीसुद्धा लिहून पहाल असच कुणाला तरी पत्र ? आता कोणाला पत्र लिहील तर लोक काय म्हणतील? असाच विचार करताय ना तुम्ही?
        कोणी काहीही म्हणाले तरी काय फरक पडतोय....आपल्या मनाला जो आनंद मिळेल त्या आनंदासाठी कोणाला तरी नक्कीच पत्र लिहा (आई - बाबांना, आजी-आजोबाना नाहीतर काका-मामांना आश्चर्याचा सुखद धक्का द्या).अगदी निसंकोच मनाने लिहा. फोन आणि मेसेजेसच्या जगातून थोड बाहेर निघून.कारण आता आमच्याकडे पाणी दिवसातून दोनदा यायच्या ऐवजी चार दिवसा आड येते  आणि पोस्टमन दिवसातून एकदाच काय कधीच येत नाही..!
        आपल्या आजच्याच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची हि अवस्था आहे तर पुढच्या पिढीला तर वस्तूसंग्रहालयात नेउनच दाखवावे लागेल कि पत्र काय असते आणि कसे दिसते!
                                                                                                                        तुमची मैत्रीण,
                                                                                                                              अपूर्वा
       
                                                                                                                                                                                                                                                                 

Saturday 8 December 2012

एक कप कॉफीचा ..!!


खरतर हे अस रोजच होत. ब्लोगवर आज कुठल्या विषयावर लिहायचं? हा प्रश्न रोजच पडतो...मलाच नाही तर माझ्या सारख्या ब्लोग लिहिणाऱ्या अनेकांना हा प्रश्न पडत असेल नक्कीच.विषय हा अचानक सुचत असतो खरतर तो ठरवता येत नाही, कि आज या विषयावर लिहायचं...बरोबर ना?
म्हणूनच अशा अचानक सुचलेल्या विषयावरच तुमच्या बरोबर चर्चा करायची अस ठरवलंय.विषय तसा मजेशीरच आहे. कदाचित काहींना विषयाच नाव वाचल्यावर हसू सुद्धा येईल.
कॉफी !
हो, बरोबर वाचलंय तुम्ही कॉफीच..
आता या विषयावर बोलायसारख  काय असणार असाच विचार करताय न तुम्ही ?
भरपूर आहे कि बोलय सारख...
आता हेच पहा ना कॉफी पीत होते म्हणून कॉफीवर लिहायचं सुचल.....
सकाळी लवकर उठून अभ्यास करणाऱ्यांना सकाळच्या त्या कॉफीच महत्व विचारा.
सकाळी नाष्ट्या नंतर पेपर वाचताना जर  मस्त गरमा गरम, वाफाळती कॉफी भेटली तर..? अहाहा ! दिवस एकदम मस्त जातो मग सगळा. किंवा मग स्वत:साठी थोडा मोकळा वेळ काढायचा असेल तर मग सकाळी मस्त स्ट्रोंग कॉफी घेत त्या उगवत्या सूर्याकडे पहायचं.अगदी प्रसन्न वाटत.
कॉफी प्यायला तसा वेळ काळ लागत नाही म्हणतात! एखादी जुनी मैत्रीण किंवा मित्र जर रस्त्यात भेटली / भेटला तर तेव्हासुद्धा आपल्याला कॉफीच आठवते.मग कॉफी घेत घेत त्या शाळा-कॉलेजच्या जुन्या आठवणीना उजाळा द्यायचा.
ऑफिसमध्ये काम करून जर कंटाळा आला किंवा थकवा आला तर आपण मूड फ्रेश करण्यासाठी एक कप मस्त गरम कॉफिचीच ऑर्डर देतो कि नाही? बऱ्याच लोकांना तर जेवण झाल्यावर पण कॉफी घ्यायची सवय असते बरका .
जेवणा नंतर घेतलेल्या कॉफिचीतर मज्जाच काही और असते!
अहो,अगदी आपण रात्री उशिरा पर्यंत अभ्यास करायचो तेव्हासुद्धा झोप येऊ नये म्हणून कित्ती कॉफी प्यायचो, आठवतंय ना? नवीन मैत्रीची सुरुवात करताना सुद्धा हि कॉफीच साक्ष असते..!
आमच्या तुमच्या सारख्या लेख लिहिणार्यांना तर लेख लिहिताना जर जायफळ घातलेली कॉफी भेटली तर लिखाणाला जास्त उत्साह येतो! संध्याकाळच्या कॉफी सोबत जर एखाद आवडीच्या लेखकाच पुस्तक वाचायला भेटल तर मग आपल्याला दुसर काही करावच वाटत नाही.
हे तर फक्त दैनंदिन कॉफिबद्दलच बोललो.....बदलत्या ऋतूसारखी कॉफी सुद्धा बदलते हं ..!!
उन्हाळ्यातली ती खूप गरमतय म्हणून घेतलेली कोल्ड कॉफी. त्या कॉल्ड कॉफीच महत्व सांगून समजणार नाही असच आहे.
थंडीत ती गोधडीत बसून घेतलेली कॉफी !अहाहा! आणि ती पावसाळ्यातली खिडकीत बसून पावसाची मज्जा पाहताना गरमा गरम भाज्यांसोबतची कॉफी..!अप्रतिमच ..!
 कॉफीचे प्रकार सुद्धा किती असतात हो ?
सगळ्यांची कॉफी बनवायची पद्धत वेगळी असते अगदी. इनस्टंट कॉफी, उकळायची कॉफी, बिनदुधाची कॉफी,जायफळ लावलेली कॉफी, इराणी कॉफी, मद्रासी कॉफी आणि अजूनही बरेच प्रकार...!
    कॉफी, कॉफी, कॉफी ... पळते आता मी कॉफी प्यायला.!!

Saturday 24 November 2012

गोष्ट : 'तिची' आणि 'त्याची' ....

        म्हणतात कि चोरून लपून गाठी-भेटी झाल्याशिवाय खऱ्या प्रेमच शिक्कामोर्तब होत नाही.म्हणूनच अशा भेटींचा ठेवा त्या दोन जीवांसाठी खाजीण्याहूनही जास्त मोलाचा असतो आणि वाढत्या वयाबरोबर तो ठेवा एखाद्या जुन्या लोणच्यासारखा मुरत जातो. 
        तिला त्याची वाट पाहत तास न तास ताटकळत उभी राहिलेली अनेकांनी पाहिलीय.आणि आज दोन मुलींची आई होऊन फिरतानाही बघतायत.सार कस लख्ख आठवत तिला अजूनही.....
        तिचा नोकरीच गाव तिच्या गावापासून पंधरा मिनिटांच्या अंतरावरच होत.ऑफिस तस पाच वाजता सुटायचं पण तीच मन पहिलेच बस स्टोपवर पोहोचलेल असायचं.त्याच्या प्रेमात अशी कोणती जादू होती कोणास ठाऊक कि त्याला भेटल्याशिवाय ती stand वरून जागची हलायची नाही.
       त्याची वाट पाहत असताना तिला सारख वाटायचं कि लोकांच्या नजर तिच्यावरच खिळल्या आहेत. एखाद्या चप्पल तुटलेल्या माणसाला वाटतना कि सगळे त्याच्याकडेच बघतायत अगदी तसच. खरतर अशा सार्वजनिक ठिकाणी रोज नवी माणस येणार आणि निघून जाणार. तिच्याकडे कोण कशाला पहातय? पण तिला आपल अस वाटायचं खर. तो कोपऱ्यावरून वळताना दिसतोय का हे पाहण्यासाठी तिची मान उंचावून उंचावून दुखायला लागलेली असायची.पण तो आपला खुशालचेंडू सारखा त्याला यायचं तेव्हाच यायचा. 
        प्रेम करण म्हणजे समाजासाठी गुन्हा आहे. या विचाराने तीच मन कातर व्हायचं. अनेक शंका कुशकांनी तीच मन भरून जायचं अगदी तो आपल्याला फसवणार तर नाही ना या विचारांपर्यंत ती येऊन पोहोचायची. पण कोपऱ्यावरून तो येताना दिसला आणि त्याच्या मिशीतल हसू पाहिलं कि तिचा जीव भांड्यात पडायचा.त्याच्यासोबत तिला त्या टोचणाऱ्या नजरांच सुद्धा भान रहायचं नाही.
         स्त्री प्रेम करते ते भरभरून! पुरुषांसारख तिला फुलपाखरू नाही होता येत.ती बेल वाहणार तो एकाच महादेवाला! 
          तशी या दोघांची भेट तरी किती....तो तिला तिच्या परतीच्या प्रवासात बसमध्ये सोबत करायचा. तेवढ्यात जे बोलन होईल तेच. बस मध्ये जर गर्दी असली तर मग नुसती नजर भेट.तिला तिच्या गावी सोडून हा परतीच्या बसने लगेच परत फिरणार.त्या दोघांनी कधी एकमेकांना दोन बोटांची चिठी कधी लिहिली नाही कि बागेत किंवा हॉटेल मध्ये भेटण्याची त्यांना गरज वाटली नाही. आणि शेवटी या प्रेमाच रुपांतर लग्नात झाल.
         पण प्रेम म्हंटल कि समाजाचा विरोध हा आलाच.ती रात्र त्या दोघांसाठी वादळी ठरली.त्या वादळात तीच माहेर पाचोळ्यासारख उडून गेलं. प्रेमाची गोड शिरशिरी देणाऱ्या मनाला बाहेरून धैर्याची कवच-कुंडले लाऊन त्यांनी समाजाचा वज्राघात परतून लावला.
         आता त्याचा 'आहो'झालाय आणि तिची 'अग'. प्रियकर-प्रीयसिच्या पदावरून त्याचं प्रमोशन झालय. जे त्यांना त्यांच्या मुलींनी दिलय.आई-बाबांचं प्रमोशन. पण अजूनही तिला लग्नाच्या आधीचे दिवस आठवतात.आणि तीच मन हलक होत. आठ- आठ वर्ष प्रेम संबंध ठेऊनही लोकांना जे साधत नाही ते त्यांना दोन महिन्यांच्या भेटीत साधल होत.
         पण एखादी माळ तुटून सगळे मनी निखळून जावेत तशीच दोघांची सगळी अगदी सगळी नाती निखळून गेली. दोघेही एकाकी झाले आणि म्हणूनच त्या दोघांच प्रेम दृढ होत गेल.त्यांना दु:ख वाटत ते एकाच गोष्टीच कि त्यांच्या मुलींसाठीही ह्या सगळ्या नात्याची दार बंद झाली. एकच नात त्या सांगू शकतात.आई-बाबांचं नात. 
         त्यांच्या मुली समजू शकतील का या दोघांच नातं? त्याही शिकतील का जीव ओतून, समरसून प्रेम करायला? 
         या दोघांसाठी ज्या वाटा काट्यांच्या वाटा ठरल्या, त्याच वाटा त्यांच्या मुलींसाठी फुलांचा गालीचा ठराव्यात हीच त्या दोघांचीही इच्छा आहे.

                                        ------------------------------------------------------------

     मित्रानो , हि कुठलीही काल्पनिक कथा नाही. ह्या कथेतले 'ती' आणि 'तो' खरच अस्तित्वात आहेत आणि आपल आयुष्य एकमेकांसोबत आनंदाने जगतायत...!!

Tuesday 20 November 2012

"चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद "

    अस म्हणतात कि पुस्तक वाचन म्हणजे एक व्यसनच असत. कारण एकदा कि पुस्तक वाचायची गोडी आपल्याला लागली तर मग स्वतःला या गोडीपासून लांब ठेवताच येत नाही.
                ग्रामीण भागात खर तर पुस्तक वाचनाबाबत , ती खरेदी करण्याबाबत खूप उदासीनता दिसून येते. वाचनालयाकडे तर कोणी फिरकतसुद्धा नाही.
               मी अशाच ग्रामीण भागात वाढलेली मुलगी.आई बाबा दोघ नोकरी करणारे, त्यामुळे नेहमी एकट रहाव लागायचं. अशातच पुस्तक वाचायची गोडी लागली आणि हळूहळू पुस्तकांशी मैत्रीच झाली. शाळेतील आणि महाविद्यालयातील मराठीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक पाठाच्या वर संदर्भ दिलेला असायचा, त्यावरूनही बरीचशी पुस्तकांची माहिती मिळायची.ती पुस्तक आपल्याकडे हवीशी वाटायची.आमच्या गावात चांगली पुस्तक वाचायला मिळण खरतर कठीणच. आणि शहराशी संपर्क नसल्याने चांगली पुस्तक वाचायला भेटायची नाहीत. पण गावातल्या वाचनालयात मिळाली तेवढी चांगली पुस्तक मी वाचून काढली.
                गावात वर्षानुवर्ष पुस्तक प्रदर्शन भरत नाही. माझ्या पाहण्यात गावात फक्त दोनदाच पुस्तक प्रदर्शन भरलय. मागच्या वर्षी भरलेलं पुस्तक प्रदर्शन हे चांगली पुस्तक खरेदी करण्याची सुवर्णसंधीच होती माझ्यासाठी.या प्रदर्शनातून मी काही चांगल्या लेखकांची नावाजलेली पुस्तक घेतली.मारुती चितमपल्ली याचं 'चकवा चांदण',उत्तम कांबळेंच  'आई समजून घेताना',अब्दुल कलाम याचं 'अग्निपंख',डौं.नरेंद्र जाधवांचं 'आमचा बाप आणि आम्ही'...यासारखी बरीच पुस्तक घेतली. सगळीच पुस्तक अप्रतिम आहेत, पण मला सगळ्यात जास्त आवडलेलं पुस्तक म्हणजे मारुती चितमपल्ली याचं 'चकवा चांदण-एक वानोपानिषद '.
                 हे पुस्तक म्हणजे चितमपल्ली याचं आत्मकथन आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असलेल घुबडाच चित्र पाहिलं कि पहिला प्रश्न आपल्या मनात येतो तो म्हणजे पुस्तकच नाव इतक सुंदर काव्यमय आहे तर मग चित्र घुबडाच का? पण आपल्या या प्रश्नाला लेखकाने खरच खूप छान उत्तर दिलय-रानावनात राहणारे पारधी, आदिवासी घुबडाला 'चकवा चांदणं ' म्हणतात. त्यांच्या मते हा अभद्र पक्षी सांजेच्या वेळी ओरडून त्यांची दिशाभूल करतो.अशावेळी हे आदिवासी  जंगलात जिथे असतील तिथेच  बसून राहतात.त्यांना चकवा पडतो.पण अभाळात शुक्राची चांदणी दिसू लागताच हा चकवा निघून जातो आणि आदिवासींना वाट सापडते,म्हणून घुबडाला ते 'चकवा चांदण' अस म्हणतात.
                  या पुस्तकात लेखकाने आपले अरण्य अनुभव सांगितले आहेत. रानावनातल्या आपल्याला माहित नसलेल्या आणि चक्रावून टाकणाऱ्या अनेक गोष्टी यात सांगितलेल्या आहेत. हे पुस्तक आवडण्याचे असे एक कारण सांगता येणार नाही, कारण लेखकाने त्यांचे जे अनुभव यात सांगितले आहेत ते इतके सुंदरपणे वर्णन केले आहेत कि ते वाचताना आपल्यासमोर जिवंतपणे उभे राहतात.आणि आपण प्रत्यक्ष त्यांच्या सोबत जंगलात भटकंती करतोय असे वाटते.
                   त्यांच्या शालेय जीवनाचा प्रवास आणि महाविद्यालयात घेतलेल्या विज्ञान शाखेकडून ते वनाभ्यासाकडे कसे वळले, या सगळ्या शिक्षणात त्यांना भेटलेले सहाध्यायी आणि त्यांच्या शिक्षकांचे वर्णनही असेच सुंदर रीतीने मांडलेय.
                    लेखकाचे आई वडील ,इतर नातेवाईक आणि समाज बांधव यांचे संबंध ,त्यांच्यासोबत लेखकाला आलेले अनुभव त्यांनी संकुचित वृत्तीने लपवून न ठेवता तेही खुलेपणाने सांगितले आहेत. त्यामुळे आपल्याला एका वेगळ्या समाजाची ओळख होते.
                   डॉ. सलीम आली सारखे पक्षीनिरीक्षक,चित्रकार ए. ए. आलमेलकर,बाबा आमटे,गो. नि. दांडेकर,गंगाधर गाडगीळ,व्यंकटेश माडगुळकर, जि. ए. कुलकर्णी या सर्वांसोबतचे चितमपल्ली यांचे अनुभवही या पुस्तकाचे वाचन मुल्य वाढवतात.किती सहजतेने त्यांना या महान व्यक्तींचा सहवास लाभला,याचे वर्णन वाचताना मन भारावून जाते.
                   वानविभागाबाबत  आणि एकूणच जंगलान बाबत अनेकांना आवड नसते. पण हे पुस्तक वाचताना आपण जंगल सफारीचा आनंद लुटू शकतो तसाच गड दुर्गांचाही आनंद लुटू शकतो.त्यामुळे एकदा हे पुस्तक वाचायला सुरु केल्यावर त्याचा फडशा पडल्याशिवाय राहवले जात नाही आणि घरबसल्या वन भ्रमंतीचा एक सुंदर अनुभवही मिळतो.
                   पुस्तकाची किमत थोडी जास्त वाटू शकते पण पुस्तक वाचल्यावर आपल्या विचारातील (किमतीचा) ठीतेपणा जाणवतो.सर्वच वयातील वाचकांनी वाचावे असे आणि आपल्या संग्रहात असावे असे हे पुस्तक तुम्हालाही नक्कीच आवडेल अशी अशा करते...

Monday 19 November 2012

" छडी लागे छम छम, विद्या येई घम घम.."

        'विद्यार्थ्यांना मारणाऱ्या शिक्षकांना जेल होणार' हि गोष्ट सरकारने जाहीर केल्यापासून याबद्दल बरेच तर्क वितर्क लढवले जातायत. बराच बर वाईट बोलं जातंय.खरतर या सगळ्यामुळे मुलांना शिक्षकांची भीती वाटायपेक्षा शिक्षकांनाच मुलांची भीती वाटायला लागलीय.
          सर्वांसमोर शिक्षकांनी मुलांना मारले किंवा रागावले तर त्या विद्यार्थ्याला अपमान वाटतो आणि त्याच्यावर मानसिक परिणाम होतो म्हणे! म्हणून हा कायदा.......या कायद्याबद्दल समजल्यावर सर्वच आई-बाबांना आपला शाळा- महाविद्यालयातील काळ आठवल्या वाचून राहिला नसेल ( अगदी आत्ताच महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा )
           अगदी काही वर्षांपूर्वी पर्यंत शिक्षकांची आदरयुक्त भीती विद्यार्थ्यांच्या मनात असायची.शिक्षकांनी जर शिक्षा केली तर त्याबद्दल विद्यार्थी घरी वाच्यतासुद्धा करायचे नाही.कारण त्यावेळी पालकांनासुद्धा शिक्षकांबद्दल विश्वाश आणि आदर होता.पालकांना जरी समजल कि शिक्षकांनी आपल्या पाल्याला शिक्षा केली तरी ते शिक्षकांना जाब विचारीत नव्हते. 'आपल्या पाल्याची चुकी असल्याशिवाय गुरुजी त्याला/तिला शिक्षा करणार नाही याची खात्री पालकांना होती.
            काळ बदलला .......... आता बऱ्याच  कुटुंबात एकच आपत्य असल्याने जरा कोड  कौतुकताच त्याला वाढवले जाते आणि अशातच जर शाळा-महाविद्यालयात जर शिक्षकांनी त्याला काही कारणास्तव शिक्षा केलीच तर पालक सर्व दोष शिक्षकांनाच देतात. यात आपल्या पाल्याची चुकी आहे कि नी याची चौकशीसुद्धा करत नाही.
            आणि त्यातच आणखीन भर म्हणून आता आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना नापास करायचे नाही..(?)असाही नियम काढलाय.यामुळे विद्यार्थ्यांना आता आणखीनच मोकळीक मिळालीय.
             काही प्रमाणात हे नियम योग्य आहेत कि विद्यार्थ्यांना मारायचे नाही.कारण बऱ्याचदा शिक्षक शिक्षेच्या नावाखाली आपली वैयक्तिक दुष्मनी काढतात.पण जर देशाला उद्याचा कर्तबगार नागरिक घडवायचा असेल तर आजच्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळणे गरजेचे आहे. अशातच जर विद्यार्थ्यांना काही सौम्य प्रकारच्या शिक्षा शिक्षकांनी केल्या तर त्यात काही वाईट नसेल.कारण एकुलते एक अपत्य म्हणून आणि आई- बाबा दोघेही नोकरी करत असल्याने त्यांच्या मनात अपराधी भावना असते मग "क्वालिटी टाइम" देण्याच्या नावाखाली त्याचे खूप कोड कौतुक करतात.शिस्त धाक यांचा अभाव आढळतो.याचा अर्थ काय..? घरीपण कोणी रागवायचे नाही आणि शाळेतही नाही.....मग मुलांना वळण कसे लागणार.एखादे चित्र जसे चौकटीत छान दिसते तसेच मुलांना शिस्त व धाकाची चौकात असायलाच हवी.
            सरकार जे नवीन नवीन कायदे करते ते मुलांना वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमांमुळे लगेच समजतात.त्यामुळे त्यांना शाळा आणि शिक्षकांची आदरयुक्त भीती वाटणार नाही.जुन्या पिढीला त्यांच्या शिक्षकांनी जसे घडवले त्यामुळे ती पिढी बिघडली का.?दिशाहीन झाली का ? नाही ना ..? मग आत्ताच शिक्षेचा बाऊ का..?
            माझी आज्जी तर म्हणते.." छडी लागे छम छम, विद्या येई घम घम.."        

Saturday 17 November 2012

मी शिवाजी पार्क बोलतोय !

                   आज सगळ्यांच्या मुलाखती होतायत, सगळ्यांनी मन मोकळ केलय, पण मला कोणी विचारेल का?मला काय वाटतंय ते.आज माझ्या या शिव तीर्थावरचा देव हरपला. अनंतात विलीन झाला.
                    मला, या शिवाजी पार्कला ज्याने तीर्थाचे स्वरूप आणल त्या हिंदुहृदय सम्राटाला माझे शतशः नमन!जेव्हा जेव्हा हा ढान्या वाघ गुहेतून निघाला तेव्हा तेव्हा त्याने माझ्या साक्षीनेच गर्जना केली, डरकाळी फोडली.माझा परिसर दणाणून सोडला. त्याला ऐकायला येणार्यांनी इतकी गर्दी केली कि मुंगीलाही शिरकाव नसावा.
                      शिवसेनेच्या जन्मानंतर मला या वाघाची प्रथम ओळख झाली आणि लोकांनी माझ्या साक्षीने त्याची पहिली गर्जना ऐकली. तो दिवस होता ३० ऑक्ट. १९६६. बाळासाहेबांची पहिली जाहिर सभा या माझ्या परीसारात झाली.पाच लाखाचा जनसमुदाय त्यांना ऐकायला जमला होता.तेव्हा तो समुदाय कोणत्या एका पक्षाचा नव्हता, ते होते हिंदुत्वावर प्रेम करणारे लोक.तेव्हापासून आजतागायत शिवसेनेचा दशहरा मेळावा, बाळासाहेबांची गर्जना आणि शिवाजी पार्क एक झाले.माझ्या परिसराला तीर्थाचे रूप आले.
                    अशी एकच गर्जना मी आचार्य अत्र्यांची ऐकली होती!
                    बाळासाहेबांच्या माझ्या परिसरातल्या सभा लोक कधीच विसरू शकणार नाहीत.त्यांनी मलाही इतिहासात अजरामर करून ठेवलं.
                    उद्या बाळासाहेब माझ्या कुशीत विश्रांती घेतील,केव्हढा हा दैवदुर्विलास.ज्या वाघच राज्य माझ्या साक्षीने सुरु झाल त्याचा शेवटही माझ्या साक्षीने व्हावा? माझ मन आक्रांदतय.
                   आता हा शिवाजी पार्क त्या महान हिंदू हृदय सम्राटाची गर्जना कधीच ऐकू शकणार नाही.या शिवातीर्थाचा देव हरपलाय. उद्या लाखो लोक जमतील त्याला निरोप द्यायला , पण मलाही विचाराहो कोणी, मला काय वाटतय.
                   पुढेही दशहरा मेळावे होतील, सभा होतील , पण या वाघाची डरकाळी मुंबई दणाणून सोडायला नसेल.
                      

Friday 16 November 2012

"टिकली बांगडीच स्वातंत्र्य........."

 
                   स्त्रीच विश्व खरतर खूपच वेगळ असत.तिच्या या विश्वाबद्दल आणि त्यात काळानुसार होत गेलेल्या बदलांबद्दल जितका विचार करू तितका थोडाच आहे.कधी मुलगी, कधी पत्नी, तर कधी आई. कोणाची ती सून असते तर कोणाची सासू, मामी, काकू, बहिण, आत्या, मावशी, आजी प्रत्येकच नात्यात तीच रूप वेगळ असत. दुध आपण ज्या आकाराच्या भांड्यात टाकू तसा ते आकार घेत, स्त्रीच सुद्धा तसाच असत, नात्याप्रमाणे ती स्वत:ला बदलते.पण जगाच्या पाठीवर कुठेही गेल तरी स्त्रीच जगणं बदलत नाही. आत्ताच्या या एकविसाव्या शतकात रांधा, वाढा, उष्टी काढा,यांच्या पलीकडे स्त्रीला अस्तित्व आहे.तरी अजून घरात, समाजात, मिळणारी वागणूक  तिला दुय्यम ठरवते. पूर्वी स्त्रीच आयुष्य फक्त चूल आणि मुल इतकाच मर्यादित होत. घरातल्या अनेक महत्वाच्या निर्णयांमध्ये  तीच मत विचारात घेतलच जात नव्हत. स्त्रीने घराच्या बाहेर निघायला सुद्धा बंदी होती. व्रतवैकल्यानसारखे प्रकार सुद्धा ती करत होती आणि आश्चर्य म्हणजे त्यावेळच्या बऱ्याच स्त्रियांना हे सर्व योग्य वाटत होत!
                             " डोळे असून पहायचं नाही,
                               कान असून ऐकायचं नाही,
                               तोंड आहे म्हणून बोलायचं नाही..."
अशीच स्थिती पूर्वीच्या काळी बायकांची होती. कालांतराने ती स्थिती बदलली. सावित्री बाईंची  हि स्थिती बदलण्यात मोलाच योगदान आहे. आज हीच स्त्री पुरुषांच्या बरोबरीने ( कदाचित पुरुषांपेक्षा जास्त) काम करते.पण नव्वारी नेसायची सोडून जीन्स घालायला लागली असली तरी स्त्रीच पोतेर व्हायचं राहत नाही.
              सुनिता विल्यम्स किंवा सायना नेहेवाल किंवा मग सोनिया गांधींच नाव घेऊन आपल्याला थांबता येणारच नाही. कारण आज छोट्या गावातल्या स्त्रिया सुद्धा घरच सगळं काम करून शेतात सुद्धा राबतात. शहरात सुद्धा स्त्रिया आठ तास नोकरी करून तितकाच वेळ घरीसुद्धा काम करतात.म्हणजेच काय तर बौद्धिक असो व शारीरिक श्रम असो स्त्री पुरुषांच्या बरोबरीने आहे.पण आज सुद्धा तिला या सगळ्या कामांबरोबर व्रत-वैकल्य सुद्धा साम्भालावेच लागतात.
              स्त्री पुरुषांच्या बरोबरीने असली तरी देशातल्या पुरुषप्रधान संस्कृतीपुढे तिची किंमत केली जात नाही. उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर पत्नी जेव्हा नोकरीत पतीपेक्षा जास्त यश मिळवते तेव्हा पतीचा अहंकार दुखावला जातो आणि मग तिच्यावर विनाकारण संशय घ्यायला सुद्धा पती कमी करत नाही.अजूनही काही खेड्यांमध्ये स्त्रीला पायातली चप्पलच समजले जाते.घरात मुलगी जन्माला आली म्हणजे संकट आल असाच विचार काही लोक करतात. यात जर अशिक्षित कुटुंब असेल तर मुळीच जगण कठीण होत.ती लहान असताना तिच्या वाट्याला आलेल टिकली बांगडीच स्वातंत्र्यसुद्धा पुढच्या आयुष्यात तिच्या वाट्याला येत नाही. समाजात स्त्री म्हणजे पिता,पती,पुत्र  यांच्या आधारानेच चालणारी व्यक्ती आहे. तिला स्वत:च कुठलंच स्वातंत्र्य नाही आणि या पिता,पती,पुत्राच्या काटेरी कुमपनातच तिने जगायचे असे समजले जाते. त्यामुळे साहजिकच तिच्या संबंधीचे सर्व निर्णय या तीन व्यक्तीच घेतात.
               आमच्या कुटुंबात सुद्धा आम्ही दोघी बहिणीच आहोत.समाजात वावरताना बऱ्याचदा आई-वडिलांना प्रश्न विचारतात.'मुलगा नाही का?' कुटुंबाला वंशाचा दिवा नाही याचा लोकांना खेद वाटतो .
मुलगा जन्माला आल्यावर लोक पेढे वाटतात.पण हेच मुल मोठे झाल्यावर आई-वडिलांना वृद्धाश्रमाचा  रस्ता दाखवतात. तरी लोकांना मुलांचेच कौतुक वाटते.मुलींचं आपल्या आई-वडिलांवर कितीही प्रेम असल तरी त्या नकोशाच असतात.
                समाजात अजूनसुद्धा लहान ( १५-१६ वर्षाच्या) मुलींची लग्न लावली जातात.त्यात त्यांची संमती सुद्धा पहिली जात नाही.यामुळे त्यांना इच्छा नसतानाही शिक्षण अर्धे सोडावे लागते.
फक्त खेड्यातच नाही तर शहरांमध्ये सुद्धा काही वेगळी स्थिती दिसत नाही.बऱ्याचदा रेल्वेत किंवा रस्त्याने चालताना पुरुष मुद्दाम धक्का देतात. किंवा अपशब्द वापरतात. विप्रो सारख्या मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या आणि उच्च शिक्षण घेतलेल्या ज्योती कुमारीला सुद्धा या प्रसंगाला सामोरे जावे लागले. मग परिस्थिती बदलली कुठे? स्त्री काळ सुद्धा असुरक्षित होती आणि आज सुद्धा असुरक्षितच आहे.अस नाही कि तिला स्वत:च्या इच्छेप्रमाणे वागता नाही येत. ती स्वत:च्या इच्छेप्रमाणे वागते. पण समाजात अशा स्त्रिया खूप कमी आहेत.
                सध्याच्या तरुणींमध्ये 'इन ए रिलेशनशिप' ची जास्त 'क्रेझ'दिसून येते. त्यांना वाटे कि लग्न न करताच जर आपण एकत्र राहिलो तर आपल्याला स्वातंत्र्य राहील. आपण आपल्या मर्जीप्रमाणे वागू शकू. पण कालांतराने या नत्याच रुपांतर आपोआपच लग्नात होत आणि मैत्रीच नवरा बायकोत. त्यामुळे प्रत्येक वेळा जोडीदाराकडून दुय्यम स्वरूपाचीच वागणूक तिला मिळते.
                आताचाच एक प्रसंग अजूनही स्मरणात आहे.मी सध्या प्रथम वर्षाला आहे आणि बारावीच्या सुट्टीत आजीकडे गेले होते. नेहेमीच्या सवयी प्रमाणे सकाळी आवरून वृत्तपत्र वाचायला बसले होते. लगेच आजीने येऊन सुनावलं, " पुरुषांसारखी पेपर काय वाचत बसलीये ,पेपर वाचून कोणता देश चालवायचा आहे तुला.ते पुरुषांनाच शोभत सकाळी-सकाळी पेपर वाचत बसण ." आजीच हे वाक्य कानावर पडल आणि आश्चर्यच वाटल. आजच्या या एकविसाव्या शतकात सुद्धा असा विचार केला जातो.खरतर अशा रोजच्या छोट्या छोट्या प्रसंगांमधून स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जातो.आणि आपल्याकडे तर लहानपणा पासूनच मुलामुलींना शिकवलं जात, हे काम मुलाचं आहे , हे काम मुलींचं आहे. मुलींची काम मुलांनी नाही करायची. खरतर इथूनच स्त्री पुरुष भेदभावाचा पाया रोवला जातो.
              मागे एकदा फादर फ्रान्सिस दिब्रीतोंचा एक लेख वाचनात आला. त्यात त्यांनी त्यांच्या पाश्चिमात्य देशातील प्रवासाचे वर्णन केले होते. ते अमेरिकेत एका घरी जेवायला गेले होते तिथे घरातल्या आईने स्वयंपाक केला होता. तर मुलांनी आणि पुरुषांनी तो वाढला.उष्टी खरकटी सुद्धा सर्वांनी मिळून म्हणजे आई आणि मुलांनी मिळून काढली.आपल्याला या गोष्टीच नवल वाटू शकत. कारण मुलांनी स्वयंपाक घरात मदत करण्याची पद्धत काही अंशी सुद्धा आपल्याकडे नाही.त्यामुळेच मग मुलांमध्ये स्त्री पुरुष भेदभाव निर्माण होतो. म्हणून स्त्रीला नेहेमी दुयाम ठाण मिळत गेले.
               म्हणतात कि जग कितीही बदललं तरी स्त्रीसाठी ते कधीच बदलत नाही, समाजाचा तिच्याविषयीचा दृष्टीकोन कधीच बदलत नाही. स्त्री घर आणि नोकरी अशा दुहेरी भूमिका बजावते.देश चालवण्याची क्षमता सुद्धा तिच्यात आहे. तरी तिला कमीच लेखले जाते. पण हीच स्त्री जन्मापासून तर मरेपर्यंत नेहेमीच कधी कुटुंबासाठी  तर कधी समाजासाठी स्वत:च्या इच्छांचा त्याग करत असते. तिच्या या त्यागांसाठी अनुराधा पाटील यांच्या या ओळी समर्पक ठरतात.
                                                          " सगळ्यांचीच मारत असते
                          
                                                              एक दिवस आई,
                                                        पण तिला माहित नसतो जाताना
                                                              आपल्या मनात तासू तासून
                                                                  होत गेलेला तिचा मृत्यू
                                                                         जन्मापासून......."
                भविष्यातील स्त्री कधी समाजाचे तिच्या भोवती असलेले काटेरी कुंपण तोडून कधी स्वत:साठी जगेल का? कि पूर्वीच्या स्त्रिया सारखीच  तीपण त्यांच्या पावलांवर पाय ठेवत आणि स्वत:च्या इच्छांचा, स्वप्नांचा त्याग करत चालत राहील. पहिले पाढे पंचावन्न म्हणत?
                                                                           "तिला करता येईल
                                                                            टकमक टोकावर उभं राहून
                                                                            हाती न येणाऱ्या
                                                                            झगमगत्या नक्षत्रावर
                                                                            स्वत:ला उधळून प्रेम ?"