Tuesday 16 April 2013

कापूस पिंजून ठेवलाय जसा …….

                 हि गोष्ट तशी आता फार जुनी झालीय. आता मी प्रथम वर्षाला आहे. आणि मी जी गोष्ट सांगणार आहे ती माझ्या अगदीच लहानपणीची आहे. तरी माझ्यासाठी खूप जवळची आहे .
                   माझा असा अनुभव आहे कि माणसाला माणस जशी जवळची वाटतात ना तितकेच प्राणी पक्षी सुद्धा जवळचे वाटतात. आणि अशा वेळी ते प्राणी पक्षी पाळण साहजिक असत. माझ म्हणाल तर मला माणसांपेक्षा प्राणी पक्षीच जास्त जवळचे  वाटतात.
                   या सगळ्याची सुरुवात मी ३-४ वर्षांची असताना झाली बहुतेक. झाल अस कि पप्पांचा एक मित्र सशे पाळायचा तेव्हा. तो त्याच काय करायचा हे मला नाही माहित. पण पप्पांनी त्याच्याकडून एक अगदीच छोटस सश्याच पिल्लू आणल होत आम्हा दोघी बहिणींसाठी.
                      तुम्हाला सांगते मित्र मैत्रिणींनो ते पिल्लू इतक छोटस होत कि पप्पांच्या तळ हातावर अगदीच सहज मावायचं . खरच सांगायचं तर त्याला पहिल्यांदा पाहिल्यावर मी आणि माझी बहिण खूप घाबरलो होतो बर का !
             आता हे पिल्लू आणल म्हणजे ते आमच्या घराचाच एक सदस्य बनणार हे नक्की होत . पण आमच्या या नवीन सदस्याला हात लावायला सुद्धा घाबरायचे मी ( तो चावेल अशी भीती वाटायची). पण तुम्हाला सांगते त्याच ते कापसासारख रूप पाहूनच मी त्याच्या जवळ जाण्याची हिम्मत केली आणि काय गंमत अगदी दोन तीन दिवसांतच माझी आणि त्याची गट्टी जमली !
            या आमच्या गोंडस पिल्लाच नाव आम्ही ''ससुली'' ठेवल . या आमच्या ससुलीचे जितके किस्से सांगेल मी तितके कमीच म्हणायचे . माझ्या आयुष्यातले लहानपणीचे सगळ्यात चांगले क्षण मी या ससुली सोबतच घालवलेत अस म्हंटल तर ते चुकीच नाही .
            ससूला आमच्या घरात रुळायला जास्त वेळ नाही लागला . काही दिवसांतच तो आमच्या सगळ्यात अगदी छान मिसळला. तस या शहाण्याचे नखरे सुद्धा काही कमी नव्हते बर का !  साधारण पणे  तो घास- गवत खाणार असच आपण गृहीत धरतो. पण याने घास खाण्याबरोबरच अजून भरपूर पदार्थ सुद्धा खाल्ले.(Chocolate,  बिस्कीट, जेम्स, कणिक , पोळी )
              ससुच्या खाण्याचे एक एक किस्से खूप विचित्र आणि गमतीचे होते. मम्मी पोळ्या करायला किचन मध्ये गेली म्हणजे या पठ्ठ्याला ते कस समजायचं कोणास ठाऊक पण हा मम्मीच्या आधी किचन मध्ये जाऊन पोहोचायचा आणि मग मम्मी त्याला कणकेचा तुकडा देत नाही तोपर्यंत तिच्या पायात घुटमळायचा तो. असच पप्पांच्या बाबतीत सुद्धा करायचा तो. आपण कस लहान असताना पप्पांना म्हणायचो ते बाहेरून आल्यावर कि 'पप्पा मला काय खाऊ आणला?' तसच हा लबाड पप्पा येण्याची वेळ झाली म्हणजे दारात जाऊन बसायचा आणि पप्पा आल्यावर जोपर्यंत ते त्याला काही खाऊ ( जेम्स, बिस्कीट)देत नाही तोपर्यंत त्यांना घरात नाही येऊ द्यायचा . तो खाऊ त्याच्या पुढे टाकण्या  इतका सुद्धा दमधीर नसायचा त्याला. पप्पांच्या अंगावर उड्या मारून मारून बेजार व्हायचा तो . आम्ही जेवायला बसल्यावर सुद्धा तीच गत ह्याची. पहिले याला जेवायला द्यायचं आणि मग तो आमच्या सगळ्यांच्या मधेच बसून जेवणार (एकट्याने तर तो कधीच नाही जेवला).
                असच आम्ही सगळे जर पलंगावर बसलेले असलो तर याने कधीच खाली थांबू नये. उड्या  मारून धडपडत तोसुद्धा वर येऊन बसणारच. आता तुम्ही म्हणाल कि ससा पाळला म्हणजे घरात घाणच घाण  होत असणार ……… तर तस काहीच नाहीय . कारण या ससुला आम्ही एक जागा ठरवून दिली होती. त्याने तिथेच जाऊन घाण करायची हे त्याला शिकवायला आम्हाला जास्त वेळ नाही लागला . ( तसा तो जात्याच हुशार होता) दुसर सांगायचं म्हणजे आम्ही त्याला त्याचे कान पकडून कधीच नाही उचलल. लहान बाळाला जस उचलतो आपण तसच उचलून घ्यायचो आम्ही त्याला .
                ससूची अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे त्याला घरातली माणस  बरोबर ओळखता यायची आणि त्यांना तो कधीच चावायचा सुद्धा नाही . पण जर बाहेरच कोणी घरी आल तर या पठ्याने त्यांना बाहेरच्या बाहेरच त्यांच्यावर ओरडून, त्यांना चावायची भीती दाखवून पळवून लावाव.
              तस आम्ही त्याला खूप जपायचो. मांजर वगैरे तर घराच्या आसपास पण फिरकू नाही द्यायचो. पण एकदा चुकून  ससू घराच्या बाहेर राहिला रात्री. बर ते त्याच्या ओरडण्याने वेळीच लक्षात आल आमच्या आणि आम्ही सगळे बाहेर पळालो. नाहीतर मांजराने तिथेच संपवलं असत त्याला . पण त्यानंतर तो कधीच एकटा घराच्या बाहेर नाही पडला एवढ मात्र नक्की .
          माझ्या सोबत खेळायलाही याला खूप आवडायचं बर का ! त्याचा एक लाल रंगाचा बॉल होता,तो आपण त्याच्याकडे लोटायचा मग तो बॉल तो परत माझ्याकडे लोटत आणायचा . आणि जर मी निवांत बसलेली असेल तर हा येऊन माझ्या जवळ बसायचा आणि माझा हात पूर्ण चाटून काढायचा .
          ससुला एकट  सोडून आम्ही कधीच  गावाला नाही गेलो आणि तशी जाण्याची वेळ आलीच तर आम्ही सगळे दार खिडक्या व्यवस्थित बंद केली आहेत कि नाही हे पाहायला आर्ध्या रस्त्यातून परत यायचो . (नाहीतर मग त्यालाच सोबत न्यायचो. ) मी अगदी पाचवी - सहावीत जाईपर्यंत होता तो आमच्या घरी . या काळात बऱ्याच गोष्टी घडल्या . तो माझा भाऊ - मित्र सगळच होता.
            अस म्हणतात कि सश्याच आयुष्य कमीच असत . हाही असाच एकदा आजारी पडला . दवाखान्यात नेल तर ताप आला होता. घरी आणल्यावर मात्र त्याने लगेचच शेवटचा श्वास घेतला . त्यावेळा मी खूपच  एकटी पडले होते . आणि त्याच्या जाण्यामुळे तितकीच रडले सुद्धा होते . तो अजूनही बऱ्याचदा आठवतो मला. त्याचा तो मऊ स्पर्श आठवतो आणि मग मन पुन्हा आठवणींच्या गावी जात .
              त्यानंतर माझ हे प्राणी पक्षी प्रेम वाढत गेल. मी रोज झाडावरच्या कावळ्यांना सुद्धा पोळी खायला द्यायचे( आता कावले क्वचित दिसतात तो भाग वेगळा).   पुढे मग मागच्या वर्षी आम्ही एक आफ्रिकन पोपट सुद्धा पाळला होता . त्याच्या पोटावर छान लाल रंगाचा पट्टा होता . त्याच्या बद्दलही सांगेल तुम्हाला पुन्हा कधीतरी . तो जास्त दिवस नव्हता आमच्या सोबत.  पण तो सुद्धा असाच जीव लाऊन गेला आम्हाला .
             खर म्हणजे माझ अजूनही मन भरत नाही आणि मला अजून अजून प्राणी पक्षी हवे आहेत . आता मी लव बर्डस आणायचे म्हणून पप्पांच्या मागे लागलेय . ते कधी घरी येतील ते तर माहिती नाही मला पण मी पुढेही अशीच प्राणी पक्ष्यांसाठी वेडी राहील हि मात्र खात्री आहे .………
                  तुम्ही पाळलाय का कधी असा कुठला प्राणी? तुमच काय मत आहे या पाळीव प्राण्यांबद्दल ? तुम्हाला आवडतात का ते ?








Tuesday 9 April 2013

माझे स्वयंपाकाचे कुटाणे !

                  बऱ्याच दिवसांपासून मी या विषयावर लिहायचा विचार करत होते . पण काही न काही करणा मुळे  ते जमत नव्हत . शेवटी आज या विषयावर लिहायचा योग आला . पण विषयाला हात घालण्या आधी जरा अर्पणपत्रिका का काय म्हणतात ती द्यावीशी वाटली म्हणून देतेय . तर मी हा लेख माझ्या मम्मीला अर्पण करतेय. कारण मी आज जे स्वयंपाकाचे कुटाणे शिकलेय ते तिच्या मुळेच. मम्मी पाककलेत निपुण आहे हे सांगायलाच नको.
                     खर म्हणजे आता स्वयंपाक करण हा सुद्धा शिक्षणाचा भाग बनलाय आणि मुल मुली दोघेही या क्षेत्रात यायला उत्सुक असल्याचे दिसून येते. आपल्याला नेहेमीच वाटत कि स्वयंपाकाच शिक्षण घ्यायचं म्हणजे Hotel Management करायला हव. पण मला अस मुळीच नाही वाटत , कारण माझ म्हणाल तर मी Hotel Management कराव अशी माझी मुळीच इच्छा नाही. पण हो, स्वयंपाकात निपुण होण्याची मात्र आहे. 
मी मुलगी आहे म्हणजे मला स्वयंपाक शिकण  गरजेच आहेच. त्यात काय नवीन ? अस तुम्ही नक्की म्हणाल. पण अस मुळीच नाही. कारण आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. पूर्वी  पंधरा सोळाव्या वर्षी पर्यंत मुलीना सगळा स्वयंपाक यायचा. पण आता जर तुम्हाला हौस असेल आणि काही नवीन पदार्थ बनवण्याची आवड असेल तरच तुमची पाऊल किचन कडे वळू शकतात . कारण आता मुलीना आपल शिक्षण आणि करिअर या गर्तेतून वेळच भेटत नाही त्यामुळे सुद्धा आणि आता पूर्वी सारख लग्न जमवताना मुलीला स्वयंपाक आलाच पाहिजे अशी आट  सुद्धा कमी झालीय. म्हणजे थोडक्यात काय तर बऱ्याच जणांना चमचमीत खाण्याची आवड तर असते पण बनवता मात्र काहीच येत नाही. याच जिवंत उदाहरण जर तुम्हाला हव असेल तर ते म्हणजे माझी बहिण . माझी बहिण  माझ्या पेक्षा १ वर्षाने मोठी आहे . तिलासुद्धा चमचमीत खायला भयंकर आवडत पण बनवता मात्र काहीच येत नाही आणि आवड्सुद्धा नाही त्यामुळे ती किचन कडे वळतच नाही . ( मला कधी कधी प्रश्न पडतो कि पुढे हीच कस होणार ?)
                      खर म्हणजे आपण आयुष्यात कधी ना कधी काही बनवण्यासाठी किचन मध्ये जातच असतो . कोणी स्वइच्छेने जात तर कोणी नाईलाजाने जात…… तुम्ही जर शिक्षणासाठी रूम घेऊन बाहेर राहत असाल तर स्वयंपाक करण्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल . बर्याचदा हे अनुभव मजेशीर असतात . माझ्यावर अजून तरी अस बाहेर राहण्याची वेळ आलेली नाही पण माझे स्वत:चे सुद्धा  काही अनुभव आहेत. काही मजेशीर तर काही खूप काही शिकवून जाणारे ……… 
                     माझी मम्मी माझ्या या स्वयंपाकाला बऱ्याचदा '' कुटाणे'' म्हणते म्हणून मग आजच्या लेखाला नावही तेच दिलय मी . 
                   मी बनवलेली पहिली वहिली डिश म्हणाल तर ती मला मुळीच आठवत नाही. खरतर मी स्वयंपाक करायला कधी सुरुवात केली तेच आठवत नाही. पण सातवी - आठवीत गेले तेव्हा मम्मी किचन मध्ये असली म्हणजे मी तिच्या मागे मागेच असायचे एवढ मात्र नक्की आठवत.  हे काय आहे ? त्याने काय होत ? मग हि भाजी अशीच का करायची ? कणिक भिजवताना मीठच का घालायचं ?एक ना अनेक प्रश्न असायचे माझे आणि त्या सर्वाना मम्मीची योग्य उत्तर सुद्धा मिळायची. मुळातच आई स्वयंपाकात, नवीन पदार्थ शिकण्यात खूप हौशी. त्यामुळे संडे स्पेशलचा आमचा मेनू काहीतरी नवीनच असतो नेहमी. खरतर मी स्वतः चायनीज फूडची शोकीन आहे. त्यामुळे म्यागी सारख्या नुडल्स मी सुरवातीला बनवायला शिकलें. नंतर हाक नुडल्स,फ्राईड  राइस यात हात अजमावला. त्यात इतकी तरबेज झालेय कि आता त्यातहि चीज, वाटाणे अस  काहीही घालून पाहण्याचे प्रयोग चालू आहेत (अर्थात स्वतःवर)
                   आईच्या नोकरीमुळे तिला बर्याचदा माझ्यासाठी काही बनवायला वेळ नसायचा . मी शाळेतून आले कि ती घरी नसायचीं. नेहमीच्या भाज्यांचा कंटाळा यायचा (त्याला तिचे ऑप्शन असे कि साखरांबा पोळी, लोणच पोळी खा किंवा पापाडचा खुडा पोळी खा मी कितवीत तर आठवीत, नववीत)मग मीच मला हव ते बनवायचे. Gas  वर सांभाळून काम करून (हि  आईची सूचना). याच काळात माझ स्वयंपाकाच प्याशन वाढत गेल. 
                     नाश्त्याचे सगळे पदार्थ, पोळीचा चुरमा, कोरड्या भाज्या, फुलके असे बरेच प्रकार मी या काळात शिकले. पण अजूनही बऱ्याच गोष्टी शिकायच्या बाकी आहेत ( अजूनही मला घडीच्या पोळ्या आणि ओल्या भाज्या जमत नाहीत बर का )!
                    आपल्या पैकी बऱ्याच जणांना काही भाज्या खाण्याचा कंटाळा नक्कीच असतो. मग त्यात काही हटके का करू नये?जस बघा जर तुम्ही नॉन - व्हेज खात असाल तर मग तुम्ही कुठल्याही कोरड्या भाजीत अंडे टाकून परतल्यावर ती भाजी पोळीसोबत खाऊ शकतात.  उदा. जर घरात भेंडीची कोरडी भाजी बनवली असेल आणि तुम्हाला त्यात काहीतरी नवीन हव असेल तर ती भाजी कढईत एका अंड्यासोबत परतून घ्या. ( अर्थातच हा प्रयोग मी स्वत: करून पहिला आहे. ) 
                    काही महिन्यापूर्वीचा एक अनुभव अजूनही स्मरणात आहे .मुंबई साईडला कच्या केळ्या ची भाजी तशी नेहेमीच केली जाते . आपल्याकडे म्हणजे नाशिक औरंगाबाद साईडला फार क्वचित हि भाजी माहिती असते . मी मुंबईला आज्जी कडे गेले होते तेव्हा हि भाजी खाल्ली होती. ( पण तिने ती कशी केली हे मात्र माहित नव्हत ) घरी परत आल्यावर हट्टाने मम्मीला कच्ची केळी आणायला सांगितली आणि माहिती  नसताना आपण उपवासाला बटाट्याची भाजी करतो तशी भाजी केली. अर्थातच ती भाजी आज्जी सारखी नव्हती तरी एक वेगळी छान भाजी शिकण्याचा तो अनुभव मस्त होता ……
                  असच काही दिवसांपूर्वी पराठे बनवताना पण झाल होत . रोजच्या भाजी पोळीचा कंटाळा आला होता म्हणून मग पराठे बनवायचे अस ठरवल . आपण पराठे पुरणाच्या पोळीसारखे सारण  भरून बनवतो हे मला माहित होत. म्हणून मग पहिले पराठ्याच पीठ भिजवून घेतल आणि बटाटे वाफवायला म्हणून बटाटे आणायला टोपलीकडे  वळले तर बटाटे संपलेले होते . आता काय ? हा प्रश्न दत्त म्हणून समोर उभा राहिला . मग थोड डोक चालवलं  आणि वाटाणे, कोथिंबीर, मिरची , आल , मीठ आणि जिरे पावडर अस मिक्सर मध्ये वाटून घेतल आणि ते मग त्या कणकेत टाकून पुन्हा कणिक एकजीव केली ( म्हणजे ते सारण भरायचा ताण  नको) आणि त्याचे पराठे लाटून ते फुलक्यासारखे भाजून घेतले म्हणजे तेल पण कमी लागते.  घरातल्या सगळ्यांनाच ते फार आवडले आणि मला एक नवीन रेसिपी शिकता आली . 
                  आपण अजून असे बर्याच भाज्यांचे पराठे बनवू शकतो बर का ! म्हणजे ते पुरण भरण्या एवजी त्या मिश्रणातच पीठ भिजवायचं ( बटाटे, कोबी , मुळा  अश्या भाज्या बारीक वाटून घ्यायच्या आणि मग त्यात पीठ भिजवायचे ) जरा काही हटके हव असेल तर तुमची एखादी रेसिपी बनवू शकता तुम्ही अशीच . 
                    अंड्याची चटणी  करताना त्यात थोडी भाजीची शेव घालायची. ते सुद्धा छान लागत . इडली फ्राय किंवा अंडा फ्राय सुद्धा माहिती असेल बऱ्याच जणांना. चिकन थोड्या तेलात आणि भरपूर साऱ्या लसुन आणि मिरचीच्या तुकड्यासोबत वरती शिजवल्यावर त्याची सुद्धा वेगळी चव लागते. 
                    असे तुमचे सुद्धा इनोव्हेशन असतील ना ? आणि तुम्ही जर पदार्थ बिघडेल या भीतीने अजूनही काहीच केल नसेल तर करून बघा. भरपूर नवीन गोष्टी शिकता येतील तुम्हाला …………