Saturday, 7 March 2020
शक्तींचा विसर की पराक्रमाची गाथा
Wednesday, 8 January 2020
विद्यापीठ नावाच बेट
'ती'चं अस्तित्व
Monday, 17 June 2019
स्त्री अध्यासन केंद्रांची केविलवानी दशा..
विद्यापीठ स्तरावर शिकायला आल्यानंतर माझ्यासारख्या अनेकांना नवनवीन दरवाजे उघडले जात असतात. काही गोष्टी नव्याने समोर येतात तर काही वेळा जुन्याच गोष्टी वेगळ्या धाटणीने पुढे येऊन उभ्या राहतात. चार वर्षांपूर्वी पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी औरंगाबादमध्ये आले तेव्हा अशाच काही गोष्टी नव्याने समोर येत गेल्या.त्यातलीच एक म्हणजे स्त्री शिक्षणासारख काही तरी विद्यापीठ स्तरावर शिकवल जात असत हे त्यावेळी पहिल्यांदाच समजलं होत. त्यामुळे अर्थातच त्याबद्दल उत्सुकता अधिक होती. पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्या नंतर इतर वर्गमित्र नेट-सेट, एम.फील सारख्या पुढच्या शिक्षणाची तयारी करीत असतानाच मी या स्त्री अध्यसन केंद्रात माझ्या द्वितीय पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि आज जेव्हा या स्त्री अध्यसन केंद्रातले शिक्षण पूर्ण करून मी मागील दोन वर्षात इथे काय शिकले किंवा माझ्या 'स्व'त्वाची ओळख मला या केंद्रात होऊ शकली का? या प्रश्नांचा आढावा घेताना सर्वांनाच विचार करायला लावतील अशा गोष्टी समोर आल्या.
प्रवेश घेतल्या नंतर पहिल्या काही दिवसातच एक गोष्ट इथे प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे अशी की इथे प्रवेश घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा 'स्त्रीवादी' असावा लागतो. (मी स्वत:ला स्त्रीवादी म्हणवून घेत नाही हे इथे नमूद करायलाच हवे.) त्यामुळे या केंद्रात वावरतांना मी स्त्रीवादी आहे का ? किंवा माझी स्त्रीवादाची नेमकी व्याख्या काय हे मला इथल्या शिक्षिकांना किंवा वर्गमैत्रिणींना कधीच नीटसे समजावून सांगता आले नाही. त्यांच्या आणि माझ्या स्त्रिवादात मला फार मोठी तफावत जाणवायला लागली आणि मग मी नेमक या केंद्रात काय शिकतेय किंवा माझ्या मनावर कोणते परिणाम इथे केले जाताय याचा सखोल विचार करण्याची वेळ आली असल्याचे सारखे वाटू लागले. आधीच विद्यार्थ्यांची संख्या कमी असलेल्या या केंद्रात कालांतराने विद्यार्थ्यांची संख्या अधिकच रोडावत गेली. अस का व्हावं ? असा प्रश्न हा अभ्यासक्रम शिकत असताना कायम पडत राहिला. कदाचित या मागच्या अनेक कारणांपैकी एक कारण हे इथे ब्राम्हणेत्तर जातींवर इथे अधिक भर दिले गेलेला असल्यामुळे सवर्ण मुलींची संख्या इथे कमी दिसून आली हे ही असू शकते. मग ही परिस्थिती फक्त याच विद्यापीठाची आहे की जिथे जिथे हे केंद्र चालविले जाते तिथे पण अशीच उदासीनता आहे असा धक्कादायक विचार सुद्धा मनात डोकावला.
इथे शिकायला सुरुवात केल्या नंतर दुसरी गोष्ट लक्षात आली ती इथल्या शिक्षक वर्गाबद्दल. इथे पुरूषांना प्रवेश निषिद्ध असल्यासारख सर्व शिक्षिकाच भरती केल्या गेलेल्या होत्या. सर्व स्त्रियाच एका जागी आल्यामुळे केंद्रात सगळा आनंदी आनंदच असल्याचे वेगळे सांगायला नको. इथे शिकवला जाणारा अभ्यासक्रम बदलण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे इथे शिकत असताना प्रकर्षाने जाणवत होते. 2000 पूर्वीचा काळ हा स्त्रियांसाठी त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्षाचा होता यात कुठलेच दुमत नसेल. परंतु आज जेव्हा स्त्रिया उच्च पदावर कार्यरत आहेत आणि त्यांना आपल्या हक्कांची जाणीव बर्यापैकी झालेली असताना त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचे सोडून भूतकाळात झालेले अन्याय अत्त्याचार कुरवाळत बसत तेच अभ्यासक्रमातून शिकवून सर्व पुरूषांना हलकट, अत्त्याचारी, आणि वासनाधीन ठरवणे खरच कितपत योग्य ठरू शकते? बर सगळेच पुरुष वाईट म्हणायचे तर आपल्या आजूबाजूला वावरणारे आपले वडील, भाऊ, मित्र हे सगळेच वाईट आहेत का? आणि आज स्त्रियांसाठी झालेले एवढे कायदे आहेत की स्वत: स्त्रियाच आपल्यावर होणारा अन्याय आज निमूटपणे सहन करीत नाहीत. स्त्रियांवर आजही होणारे बलात्कार आणि त्यांचा काही प्रमाणात होणारा छळ मला नाकारायचाच नाही. पण आता खेड्यातल्या स्त्रियासुद्धा आपल्या हक्कांविषयी एवढ्या जागरूक झालेल्या असताना अजूनही पुरुष हा अत्त्याचारी आणि स्त्री ही दुर्बल घटक असल्याने तिला सर्व सहन करावे लागते हेच का अशा केंद्रांमधून शिकवले जात असावे. त्यात सुद्धा इतिहासाच्या आणि त्यावेळच्या स्त्रियांवरील अत्त्याचाराच्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवताना इथे आगरकर, कर्वे, वि.रा.शिंदे, सानेगुरूजी, भाऊराव पाटील अशा अनेकांनी केलेले कार्य कायम उपेक्षितच ठेवले गेले. त्यापेक्षा आज आपल्या पायावर उभ्या राहू बघणार्या स्त्रियांसाठी आपल्याला काय करता येईल, त्यांना अधिक प्रोत्साहन कसे देता येईल, किंवा आपल्यावर अन्याय होतो आहे हे समजून ज्या स्त्रियांना त्याविरुद्ध आवाज उठवता येत नाही त्यांच्यासाठी माझ्या सारख्या शिकलेल्या मुली काय करू शकतील हे व्यावहारिक शिक्षण या केंद्राच्या मार्फत दिले तर त्याचा अधिक फायदा होणार आहे हे आपल्या शिक्षण व्यवस्थेला कधी समजेल? मिळणार्या सवलतींचा गैरवापर करणार्या स्त्रियासुद्धा आज समाजात वाढत असताना आपल्याला अजून अभ्यासक्रमात तिच्यावर 1857 मध्ये झालेला अत्त्याचारच शिकवला जावा ही किती दुर्दैवी गोष्ट म्हणायची? स्त्रीवाद आणि स्त्री सबलिकरनाच्या नावाखाली हा कोणता स्त्रीवाद आपण विद्यार्थ्यांना शिकवत आहोत याच उत्तर तिथल्या शिक्षिकांनासुद्धा देत येणार नाही. पुन्हा शिक्षिकांचा उल्लेख आल्याने इथे एक प्रश्न विचारावासा वाटतो तो म्हणजे स्त्री विषयी तिच्या समस्ये विषयी पुरुष किंवा एखादा शिक्षक शिकवू शकत नाही का ? की पुरुषाने स्त्रीविषयी काही बोलावे हेच आपल्याला मान्य नाही?
प्रवेश परीक्षेच्या वेळी मुलांना आलेले बघून एका मैत्रिणीने मला प्रश्न विचारला, ''मूलं स्त्री अध्यासन केंद्रात शिकून काय करणार, त्यांचं काय काम इथे ? त्यांना काय समजतं मुलींच्या विषयी''? म्हणजे स्त्री प्रश्न, त्यांच्या समस्या, स्त्रीयांचे जीवन या पासून पुरूषांना आपणच अस लांब ठेवायच आणि मग त्यांना यातलं काय समजत, त्यांना स्त्री जीवन समजत नाही म्हणून ते त्यांच्यावर अत्त्याचार करतात अशी उलटी टीका करायची याला काय म्हणायच ? आपण दुर्लक्षिलो जात आहोत, आपले सुद्धा काही प्रश्न आहेत, आपण सुद्धा माणूस आहोत याची जाणीव दुसर्यांना करूनच दिली नाही तर आपल्या अस्तित्वाची जाणीव समाजाला कशी होईल? हे सगळ समजून न घेता बेंबीच्या देठापासून ओरडत समानतेच्या चर्चा करणार्या या स्त्रिया सार्वजनिक ठिकाणी आपण स्त्री आहोत म्हणून आपल्याला सवलत मिळावी अशी अपेक्षा का ठेवतात ? अशी वस्तुस्थिती असताना मागील दोन वर्ष मी स्त्री अध्यासन केंद्रात स्त्रियांचे दुबळेपन आणि त्यांच्यावर झालेले अत्त्याचार हेच अभ्यासल ही शोकांतिका आहे. ज्या व्यावहारिक ज्ञान मिळविण्याच्या आणि इतर लाजर्या-बुजर्या स्त्रियांच्या कामी येण्याच्या हेतूने या स्त्री अध्यासन केंद्रात प्रवेश घेतला होता तो या दोन वर्षात कुठेच साध्य झाला नाही याचे दु:ख वाटते. कारण विद्यापीठ स्तरावर शिकायला येणार्या प्रत्येक मुलीला आपल्या हक्कांची जाणीव ही फार आधीच झालेली असते. त्यामुळे 'तुमच्यावर अन्याय होतो' हेच पुन्हा त्यांना शिकवणे योग्य आहे का याचा विचार या अध्यासन केंद्राच्या शिक्षकांनी आता करायला हवा. माझ्या या स्पष्ट मतांमुळे अनेक अशाच अत्त्याचाराचे टेंभे मिरवणार्या आणि स्वत:ला स्त्रीवादी म्हणवून घेणार्यांची मने दुखावली गेली असली तरी येणार्या काळात सुद्धा जर या स्त्री अध्यसन केंद्रांची स्थिती अशीच राहिली तर किती काळ ही केंद्रे तग धरून राहू शकतील हा गहन प्रश्न आहे.
Friday, 16 March 2018
It happes only in india
ईट हैपेन्स ओन्ली ईन इंडिया अस आपण म्हणतो ते उगीच नाही याचा प्रत्यय कुठे न कुठे येतच राहतो आपल्याला. आत्ताच असा एक प्रसंग घडला आणि पुन्हा वाटल की हे आपल्याकडेच होऊ शकत फक्त!
2 दिवसाची सुट्टी म्हणून आज गावाकडे निघाले. निज़ामाबाद-पुणे पॅसेंजरचा तसा हा नेहेमीचा प्रवास. आणि चढायचा डब्बा पण ठरलेलाच. अर्थात बाकी डब्यांना गर्दी फार त्यामुळे नेहमीच लेडीज़ डब्यात बसायची सवय झालीय. पण आज प्रवास करताना हा लेडीज डब्बाच का? असा प्रश्न पडला. एक 'भला' माणूस लेडीज डब्यात बसलेला दिसला तेव्हा बाहेर उभ्या काही कर्मचाऱ्यांनी आणि आमच्या सारख्या थोडा फार कायदा जाणून असलेल्यानी त्याला उतरायला सांगितले. पण भल्या गृहस्थाने मी पोलिस आहे माला पण समजत अस सांगून सगळ्यांना गप्प तर बसवलच पण जागचे हलले सुद्धा नाही! त्या वर त्यांचे असे पण मत त्यांनी मांडले की, " काय हरकत आहे सगळ्या महिलांमधे एक पुरुष असायला, चांगल वाटत कधी कधी!!" त्याचं हे बोलण ऐकून आवक झाले मी. स्वत:ला पोलिस म्हणवून घेणारे हे महाशय अस कस बोलू शकता? आणि याही पेक्षा जास्त म्हणजे पोलिस आहेत तर यांना नियम माहित नाहीत का? एक पुरुष महिला डब्यात बसलेला बघितल्याने त्याच्या सारखे अजुन 4-5 भले गृहस्थ डब्यात चढले ते वेगळेच. पण खरा राग आणि आश्चर्य वाटल ते त्या पुरुषाच्या विचारांच ज्याला महिला डब्यातून प्रवास करताना आणि तिथे बसलेल्या महिलांशी घसट करताना काहीच गैर वाटत नाही! ही झाली आत्ताची गोष्ट पण रात्री जेव्हा महिला मूली एकट्या म्हणून लेडीज डब्यातुन प्रवास करत असतील तेव्हा त्या डब्यात बसणाऱ्या अशा भल्या पुरुषांना जाब कोणी विचारायचा? तेव्हा पण महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न येतोच ना? स्त्री-पुरुष समानता आम्ही पण मागतोच की पण मग त्या समानतेच्या नावा खाली जबरदस्तीने किंवा स्वतःकडे असलेल्या अधिकारांच्या जोरावर हव ते वागण्याची मुभा मिळते असा अर्थ आहे का? मी सगळ्याच पुरुषांना चुकीच किंवा वाईट ठरवत नाहीच आहे. पण जे चुकीचे आहेत त्यांच्यावर पांघरुण सुद्धा घालता येण्यासारख नाही हेही खरच.
Monday, 26 February 2018
सौंदर्याचा अट्टाहास कशाला?
श्रीदेवींच्या अचानक झालेल्या मृत्यु नंतर त्यांच्या मृत्यु मागची अनेक करणं आज सर्वांसमोर येत आहेत. किंवा त्याबद्दल उघडपणे बोललं जात आहे. त्यातही सर्वात जास्त बोलला जाणारा मुद्दा म्हणजे, श्रीदेवी यांनी तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी केलेल्या शस्त्रक्रिया. या निमित्ताने का होईना पण नेहमी सुंदर आणि तरुण दिसण्याच्या अट्टाहासाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे, असं म्हणता येईल. आधीपासुनच आपल्या समाजात सुंदरतेला खुप महत्त्व दिल गेल आहे. असं का? याला उत्तर नाही. पण अगदी देवादिकांपासून आताच्या चित्रपटातील नट्यांपर्यंत आपण सर्वांमधे हे सौंदर्यच शोधत आलोय. या सौंदर्याची आपली व्याख्या सुद्धा किती विचित्र असते! गोरा वर्ण, लांब नाक, टप्पोरे डोळे आणि अजुन बरचस.
अस सौंदर्य आपल्या आयुष्यात एवढं महत्वाच झालं आहे की प्रत्येक जण आज स्वत:च सौंदर्य टिकवण्याच्या मागे धावतो आहे. असं सौंदर्य जपण्याच वेड स्त्रियांमधे जास्त असत. काही स्त्रिया या जन्मजातच गोऱ्या - नाकीडोळी छान असतात. या स्त्रियांना समाजाकडून, नातेवाईकांकडून सतत स्तुती ऐकून घेण्याची सवय झालेली असते. त्यामुळे आपल सौंदर्य वाढत्या वया बरोबर सुद्धा अबाधित ठेवण्यासाठी अट्टाहासाने सौंदर्यावर वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनांचा भडिमार केला जातो. डायट प्लान्स केले जातात (प्लास्टिक सर्जरी सारख्या शस्त्रक्रिया सर्वाना परवडतील अशा अजुन नाहीत).
या सगळ्या स्पर्धेत ज्या स्त्रीया दिसायला सामान्य आहेत. काळ्या-सावळ्या आहेत अशांच्या मनात आपण बाकी स्त्रियांपेक्षा कमी आहोत, आपल्यात काही तरी कमतरता आहे असा न्यूनगंड तयार होत जातो. कळत नकळत अशा स्त्रियांना त्यांच्या दिसण्यावरुन बोलल जात. अगदी मुलगी बघायला आल्यावर सुद्धा मुलगी गोरीच आहे ना अस बघितल जात. त्यामुळे अशा मूली किंवा स्त्रीया सुंदर दिसण्यासाठी सौंदर्यप्रसाधनांच्या आहारी जातात. आत्ताच्या घडीला दाखवल्या जाणाऱ्या सगळ्याच सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिराती मधे, आमच्या उत्पादनाने तुम्ही कसे गोरे व्हाल हेच सांगितले जाते. कारण आपल्या समाजात सौंदर्याला किती महत्त्व आहे हे ते सुद्धा जाणून असतात.
पण या सगळ्याची गरज आहे का? यामुळे खरच आपला रंग बदलता येईल का? असा साधा प्रश्न का पडत नसेल कोणाला? मी आहे तशी आहे. आणि समाजाने सुद्धा माला तसच बघावं असा विचार का नाही पुढे येत?
याला आपला समाज कारणीभूत आहे असच चित्र समोर येत. लहानपणा पासून आपण बघतो की एखाद्याला त्याच्या दिसण्यावरून, त्याच्या रंगावरुन चेष्टेने का होईना पण हिनवल जात. मालिका-चित्रपटांमधील नायिका नेहमीच सुंदर गोऱ्याच दाखवल्या जातात. काळी सावळी नायिका बघायला आपल्याला रुचत नाही. इतकंच नाही तर, "गोरी-गोरीपान, फुलासारखी छान. दादा मला एक वहिनी आण" अस गाण आपल्याकडे गाजत. लहान मुलांच्या अंकलिपी मधे सुद्धा 'कमल सुंदर दिसते' अशी वाक्य सर्रास दिसतात. म्हणजे हे सौंदर्याच वेड आपल्यात लहानपणा पासून रुजवल आणि वाढवल जात असत का?
खरच सगळ्याच दादांना गोरी गोरी बायको भेटत असते का? असा प्रश्न गाण एकताना किती जणांना पडत असेल? आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यातच सौंदर्याला एवढं महत्त्व आहे, तर मग या मोठ्या नायक-नायिकांच्या आयुष्यात स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी त्यांना आपली सुंदरता टिकवून ठेवायला आपल्या पेक्षा जास्तच शस्त्रक्रिया कराव्या लागत असणार! यामुळेच तर या नायिका लाखोंच्या दिलावर राज्य करतात.
एखाद्या स्त्रीच वर्णन करताना किती सहज आपण तिला 'इंद्राच्या दरबारातली अप्सरा' असं म्हणून जातो. म्हणजे मग देवाला सुद्धा सौंदर्यासक्ति होती का? तस होत तर माणूस निर्माण करताना त्याने सगळ्यांना छान, गोरच का नाही घडवल?
मी आहे तसा/तशी आहे. कधीतरी कालांतराने माझ सौंदर्य बदलेल. मी म्हातारी होईल. असा विचार सगळ्यांनी केला तर नक्कीच सगळ सोप्प होईल. पण समाजाची अशी मानसिकता व्हायला मोठा काळ लोटावा लागेल. तोपर्यंत सौंदर्याच्या आगीत सामान्य दिसणाऱ्या स्त्रीया जळत रहातील एवढं नक्की.
Tuesday, 13 September 2016
गांधारी- काल, आज, उद्या....
गांधारी- नाव ऐकलं तरी समोर येते, डोळ्यांवर पट्टी बांधून कुठलीही तक्रार न करता निमूट पणे नवर्याची साथ देणारी स्त्री. खरतरं ध्रुतराष्ट्र राजा पहिल्यापासुनच नेत्रहीन होता, हे सर्वपरिचीत आहे. पण गांधारी सोबत त्याचा विवाह झाल्यानंतर फक्त नवरा पाहु शकत नाही म्हणून स्वतः सुध्दा या जगाला पाहण्याचा त्याग केला आणि शेवटपर्यंत डोळ्यांवर पट्टी बांधून त्याला साथ दिली... गांधारीची ही गोष्ट फार मनाला लागून रहाते.
गांधारीने जेव्हा हा निर्णय घेतला असेल, तेव्हा नेमक काय असेल तीच्या मनात, हा प्रश्न नेहमीच छळतो मला. नवर्यासाठीच्या प्रेमापोटी तिन हा निर्णय घेतला होता की तिच्यावर झालेल्या संस्कारांचा पगडा इतका प्रभावी ठरला की नवर्यासाठी तिनं आपल आयुष्य बांधून घेतल..
महाभारत संपल त्या बरोबर गांधारी सुध्दा संपायला हवी होती. पण ती महाभारतातली गांधारी आजही प्रत्येक स्त्री मधून कधी ना कधी, कुठे ना कुठे डोकावताना दिसते आणि त्या गांधारीची सावली दिसली की पुन्हा वाटून जात, का केल तिने अस?
अगदी अस सुध्दा वाटत की ध्रुतराष्ट्राच्या जागी गांधारी असती तर ध्रुतराष्ट्राने काय केल असत? त्याने बांधली असती अशी पट्टी डोळ्यांवर? संपूर्ण आयुष्यभर? मुळातच त्यानं अशा नेत्रहीन राणी सोबत लग्न तरी केल असत का ? हाच मोठा प्रश्न आहे.
मी बर्याचदा या गोष्टी अनेक स्त्रीयांजवळ बोलून दाखवते तेव्हा एकच उत्तर सगळीकडे ऐकायला मिळत, ते म्हणजे, गांधारी "स्त्री" होती. ती "बाई" होती. तिने जे केल ते योग्यच होत अस सांगणार्या बायका आजही भेटतात हे नवल!
लहानपणापासुनच स्त्री वर संस्कार केले जातात ते पुरुषप्रधान संस्कृतीला अनुरूप असतील असेच. पुरुष हाच आपला रक्षण करता असतो. पुरुषाशिवाय आपल अस्तित्व नाही. अशाच गोष्टी स्त्रीच्या मनावर बिंबवल्या जातात. त्यातही नवरा नावाच्या गोष्टीला तिच्या आयुष्यात देवाच्या जागीच पाहिल जातं. (पति-परमेश्वर म्हणतात ते हेच बहुतेक).
आपला नवरा म्हणेल त्याच्या हो मधे हो मिसळून त्याचा मागे मागे चालत रहाणार्या स्त्रीया आजही दिसतात. मग तिला ते पटत असो वा नसो, पण फक्त नवरा म्हणजे सर्वस्व असत आणि त्याच्या विरुद्ध जाण म्हणजे परमेश्वराला दुखवणे असा 'डोळस' विचार इथे स्त्री करताना दिसते. "का" असा प्रश्न विचारण स्त्रीला शोभत नाही, हेच तिला पूर्वी पासुन सांगितल गेल आहे. मग नवर्या मागे चालताना तिला ठेच लागली तरी निमूट पणे तोंडातून 'ब्र' सुध्दा न उच्चारता चालत रहाण एवढच तिच्या नशिबी येत.
आणि मी म्हणेल तसच वागणार्या एका 'वस्तूचा' मी 'मालक' आहे याच आनंदात पुरुष सुखावत असतो.
महाभारतात गांधारीने जे केल ते खरच महान होत. पण काळ बदलला तरी गांधारीच्या डोळ्यांवरची संस्कारांची आणि प्रेमाची पट्टी उतरली नाही याच आश्चर्य वाटत. नवर्याच्या अस्तित्वातच आपल अस्तित्व शोधणार्या या गांधारीला, आपलही स्वतःच अस्तित्व आहे हे अजून कसं समजल नाही? ही गांधारी अजून किती काळ प्रत्येक स्त्री मधे भेटत रहाणार?
मुळातच आंधळेपणान कातड ओढलय पिढ्यान पिढ्या सर्व स्त्रीयांनी, गांधारी सारखी पट्टी समजून. पण फक्त एकदाच तिने ती उतरवली तेव्हा तिच्या दृष्टीत दुर्योधनाला अमर करण्याच सामर्थ्य आलेल होत. पण दुर्दैवी दुर्योधनाला तेही पुरेपुर घेता आलं नाही, पुरुषच ना तो! गांधारी समोर आई समजून न जाता, 'बाई' समजून गेला आणि स्वतःचा नाश करुन घेतला.
आजच्या स्त्री मधे आलं असेल का अस सामर्थ्य काही अंशतः तरी? उतरवून पाहील का ती पट्टी डोळ्यांवरुन? की तिच्याही पोटी जन्मले असतील असे दुराचारी दुर्योधन, जे आजही ठाई-ठाई दिसतात. जे "आई"ला "बाई" समजतात.
किरण येले म्हणतात तसं इथे शेवटी म्हणाव वाटत. " बये कोण आहेस तू? ध्रुतराष्ट्र पत्नी गांधारी कि दुर्योधन माता गांधारी?"