Sunday 17 May 2020

टिक-टॉक, पबजी व्हाया बेरोजगारी

 
लॉकडाऊनच्या निमित्ताने मागे काही दिवस वृत्तपत्रांची छपाई बंद ठेवण्यात आली आणि थोडे दिवस का होईना घरी निवांत राहण्याचा योग आला. मात्र हा घरात बसून राहण्याचा काळा तसा फारसा सुंदर, छान असा काही नव्हता... जवळ होती नव्हती ती पुस्तक वाचून झाली होती. थोडेफार बाकीचे कलाकुसरीचे छंद पण जोपासून झाले होते. पण काही दिवसातच वातावरणातल्या बदलाने, घामट कुंद हवेने अधिकच मरगळ यायला लागली. त्यामुळे एरवी फारसं कॉलनीमध्ये कोणाशी संबंधच न येणारी मी विरंगुळा म्हणून आजूबाजूच्या काही माझ्या सारख्या चोविशी-पंचवीशीतल्या आणि काही नुकत्याच पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या तरुण- तरुणींच्या जवळून संपर्कात आले. या काळात आत्ताच्या या माझ्यापेक्षा जास्त फास्ट अँड फॉरवर्ड पिढीचे विचार, त्यांची जीवनशैली जवळून अनुभवली. त्यात एरवी फक्त ऐकूनच माहीत असणाऱ्या टिक-टॉक, पबजी सारख्या अँप्सच अँडिक्शन या पिढीत केवढं खोलवर भिनलेलं आहे, हे पाहून हैराण झाले! कुठल्याशा जागेत उतरून लोकांना फक्त मारत सुटायचं आणि आपल्याला मारायला कोणी आलं तर मदतीसाठी खरोखरीच समोरच्याची मदत मागत ओरडायच! केवढा थिल्लर खेळ आहे हा.. मात्र हे सगळेच तरुण काही अशा थिल्लर अँप्सच्या आहारी गेलेले नाहीत हे बघून थोडं बरही वाटलं. 
मग असा कोणत्याच अँडिक्शनमध्ये नसणारा साधारण एकविशीतला "तो" एक एवढ्यात फारच गप्प आणि गंभीर दिसायला लागला तेव्हा त्याला नेमकं झालं तरी काय, हे जाणून घेण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यानेच माझ्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू केला! तेव्हा तरुण पिढीच भविष्य किती अंधारात गेलं आहे, याची जाणीव जास्त प्रखरतेने झाली.
मला वाटलं होतं त्यापेक्षा फार गंभीर आणि गहन प्रश्न होते त्याचे.. त्याच्या घरची परिस्थिती बेताचीच त्यामुळे आता डिग्री घेऊन लगेच नोकरीला लागायचं आणि घराचा भार उचलायचा, मग आपल्या पायावर उभं राहिलं की पुढचं शिक्षण घ्यायचं. अशी स्वप्न रंगवत असतानाच आता कोरोनामुळे आधीच आर्थिक मंदीचे सावट येऊन ठेपल्याने अनेकांच्या नोकर्‍यांवर गदा आलेली आहे. मग मला कोण नोकरी देणार? उमेदीच्या काळातच आता अशी गत झाली आहे तर माझ्या भविष्याचं काय होईल? अशा प्रश्नांच्या गर्तेत सापडलेला तो सैरभैर झाला होता. मात्र माझ्याकडे तरी कुठून त्याच्या या प्रश्नांची उत्तर असणार होती! खरंतर ही काय फक्त त्याचीच गोष्ट नाही त्याच्या सारख्या अनेकांना आज आपल्या भविष्याची चिंता सतावत असणार आहे.
तसं पाहिलं तर तुम्हाला, मला आणि मुळात भारतालाच बेरोजगारी हा विषय नवा नाही. पण लॉकडाऊनमुळे आता अर्थव्यवस्थेचा अधिकच बोजवारा वाजला असताना ज्यांच्या बळावर भारत महासत्ताक होऊ पाहत होता त्या तरुणांचेच भविष्य आता अधांतरी झाले आहे. एकीकडे ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे तरुणांचा एक वर्ग असाही आहे जो या लॉकडाऊनचा वेळ मोबाईलवर पबजी खेळण्यात आणि टिक-टॉकचे व्हिडिओ बनवण्यात घालवत आहे. या वर्गाला भविष्याची चिंता तर नाहीच, पण सध्याच्या परिस्थितीशी ही यांना घेणं देणं नाही. आपण भले, आपला पबजी भला असा जीवनमंत्र आत्मसात केल्यासारखे दिवस-रात्र मोबाईलमध्ये घुसून या खेळाला आणि अशा अँप्सलाच यांनी आपलं विश्व बनवल आहे. हा केवढा विरोधाभास म्हणायचा या पिढीचा !
आज ही तरुण पिढी टिक-टॉकवर वाढलेले आपले फॉलोवर्स बघून आनंदून जाते, त्यातून मिळणाऱ्या तोकड्या पैशांवर स्वतःला 'सेटल' समजते, पण उद्या बाहेरच्या खऱ्या जगात आपली काय किंमत होईल? आपल्याला आता निदान पोटापाण्यासाठी तरी काही काम मिळेल का? असे प्रश्न यांच्या गावीही नाहीत. पूर्वी आपला मुलगा वयात आल्यानंतर काही व्यसनांच्या आहारी तर जात नाही ना म्हणून पालक चिंतेत असायचे मात्र आताच्या पिढीला या अँप्सचं एवढं भयंकर व्यसन जडलं आहे की त्यापुढे त्यांना आपले आई-वडील काहीच आठवत नाही. कोणत्यातरी वेगळ्या जगात, वेगळ्या धुंदीत ते वावरत असतात आणि या सगळ्या परिस्थितीची जाणीव ज्यांना आहे... भविष्याचं कटू सत्य ज्यांना आत्ताच दिसायला लागलं आहे असा तरुणांचा जो एक गठ्ठा आहे तो दिवसेंदिवस अधिकच नैराश्याच्या गर्तेत जात आहे. भविष्याच्या चिंतेने त्यांना ग्रासलं आहे. या नैराश्यातून किंवा आपण आयुष्यात हवं ते साध्य करु शकलो नाही, म्हणून कोणी चुकीचं पाऊल उचललं तर याची जबाबदारी कोण घेईल? काळ सरकत जाईल तसं ही परिस्थिती बदलेलसुद्धा कदाचित, सगळं निट होईलही.. पण आज घडीला या तरुणांच्या अस्वस्थ मनाचे स्पंदनं थांबवत, त्यांना भविष्याची हामी कोण देईल?