Friday 14 July 2023

तुम जैसी औरतें सहनशीलता की मूरत होती है

पुन्हा एक लोकल मधील २० वर्षीय मुलीवरील बलात्काराची बातमी वाचली. गेल्या काही दिवसांत अशा बातम्या वाढल्या आहेत. क्रुरतेची सिमा गाठली जातेय रोज. या सगळ्याकडे डोळसपणे पहायला शिकवणारी दिल्लीची निर्भया केस ही माझ्या आयुष्यातली पहीलीच. किती अमानवी वागतात माणसं अस वाटायच तेव्हा. आणि या पेक्षा भयंकर अजुन काय वागेल कोणी? असं वाटल्यावर ११ वर्षांत रोज ’याही पेक्षा अजुन किती भयंकर वागणुक मिळणार आहे एखाद्या मुलीला’ असं वाटणार्‍या घटनांची साखळीच तयार झाली. कोणाला चाकुने भोसकुन मारण्या पलीकडे जाऊन आपणच प्रेम करत असलेल्या व्यक्तीचे तुकडे करण्यापलीकडे अजुन काय बघायच राहिलंय असं वाटलं तेव्हा पुन्हा एकदा माणसं किती क्रुर असतात हे दाखवणारी मुंबईचीच मिरा रोडची घटना समोर आली. खरंतर अशा खुप घटना वेगवेगळ्या शहरांत घडल्या आहेत. त्यातले हे मोजकेच उदाहरण. पण आता अशा घटना कानावर आल्या की एक मुलगी म्हणुन, स्त्री म्हणुन मन सुन्न व्हायला होत. डोळे भरुन यायला लागतात. कोणावर प्रेम केल्याची, जीव लावण्याची ही अशी शिक्षा मिळावी? अचानक ही क्रुरतेची परिसिमा गाठण्याची वेळ कशी येते? आजवर अनेकांनी एकतर्फी प्रेम केलेलं असतांना त्यात अशी अधिकाराची ’माझी नाही तर कोणाची नाही’ ही हुकुमशाहीची भावना कधी पासुन आपले मुळं रुजवायला लागली आहे?
आजकालची बदलती जिवन शैली पाहीली तर सोशल मिडीया, त्यावर दिसणारी फसवी प्रेमाची प्रतिमा, चित्रपटातली नायकाची रावडी भुमिका पाहणार्‍या मुली वरवरच्या सौंदर्याला दिखाव्याला भाळायला लागल्या आहेत. प्रियकरा बद्दलची त्यांची अपेक्षा एकाच वेळी दोन विरुध्द टोकांची आहे. तो हळवा, प्रेमळ तर हवा आहेच पण त्याच बरोबर त्याने खंबीर, थोडसं स्टायलीश, रावडी कबीर सिंग सुध्दा असायला हवं असतं. पण वरवर खुप सोज्ज्वळ वाटणारी माणसं आतून बर्‍याचदा फसवीच निघतात. मुलींना हे कळायला फार उशीर लागतो. कुठलीही गोष्ट मिळे पर्यंतच आपण ती मिळवण्याची धडपड करत असतो. एकदा की ती वस्तु आपल्या ताब्यात आली की तीचं आकर्षण कमी व्हायला लागतं. हा निसर्गाचा नियम आहे. इथे पुरुषांसाठी ही वस्तु एखादी मुलगी किंवा स्त्रीया असतात. एकदा आपली झाली की पुर्ण मक्तेदारी आपलीच, या आविर्भावात ते वागायला लागतात आणि इथेच मुलींची प्रेमाची नशा फिकी पडायला लागत असावी. 'हाच आहे का तो चेहरा ज्याच्या आपण इतके प्रेमात होतो' असं वाटुन त्या बिथरतात. पण समंजसपणा, पडती बाजु घ्यायला तर समाजाने शिकवलेलं असतंच. त्याचा वापर इथे केला जोतो. त्याचं ऐकलं, त्याच्य मनाने वागलं तर सुधरेल, आपण प्रेमाने सुधरवु सगळं, अशा भावनिक गुंत्यात एकदा मुली अडकल्या की तिथुन परतीचा मार्ग खडतरच असतो. कारण जे जीव लावतात ते जीव घेत नाही कधीच हे कळायला उशीरच होतो.
मुळातच प्रेम आकर्षण काहीही असलं तरी नात्यात एका शरिरसंबंधानंतर गोष्टी बदलायला लागतात. पुरुषांकडून वागण्यात कोरडेपणा, निष्ठुरता यायला लागलेली असते. मग बायका चुकत नाहीत का? कायम पुरुषच चुकीचे का? तर असं बिलकुलच नाही. आम्हीही चुकतो. नेहेमी एकच बाजु चुकीची नसते किंवा बरोबरही कुणाचचं नसतं. पण अजुनही काही अपवाद सोडले तर प्रियकाराचे तुकडे केले, चाकुने ’सपासप’ वार केले, बलात्कार करुन मरालया रस्त्यात सोडले, व्हिडीओ बनवुन पुढे कित्येक महिने एखाद्या पुरुषावर अत्याचार केला अशा किती घटना ऐकतो आपण? बायकांचा स्वभावच मुळात सोशिक, सहनशील असतो. त्यांना त्रास झाला, राग आला तर त्या मनस्ताप करून घेतील, वेळ पडली तर देतीलही. अगदीच सहन होण्यापलीकडे गेल्या गोष्टी तर स्वत:च जीवही देतील. पण आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या जीवावरच उठणार नाहीत. त्यांनी जीव लावला की त्यांच्यातली प्रियसी संपुन ती जागा ममत्वाची भावना घ्यायला लागते. याचाच गैरफायदा पुरूषांकडून घेतला जातो. आपण कसेही वागलो तरी आपली बायको, प्रियसी आपल्याला काहीही करणार नाही ही भावना बळावली की अधिकारवानीला सुरुवात व्हायला लागते. देवदास चित्रपटात देवदास, चंद्रमुखी नावाच्या वेश्येला ‘‘तुम जैसी औरतें सहनशीलता की मूरत होती है.’’ हे वाक्य याच काळासाठी म्हंटलेलं असावं का?
हे सर्व वाचत असतांना अनेकांना वाटेल की आपण असे नाही, आपण असं वागत नाही अशी जाणिव होऊन कितीतरी पुरुष सुटकेचा सुसकारा सोडत असतील. पण मरण फक्त देहाचं असतं का? जेव्हा पुरुषांकडुन नात्यात कोरडेपणा यायला लागतो तेव्हा बायकांच मनातुन खच्चीकरण व्हायला सुरुवात झालेली असते. नात्यातुन फक्त प्रेमाची अपेक्षा करत असताना ते ही नाकारलं गेलं की रोज कणाकणाने मरतात बायका. अशावेळी तुम्ही पुरुष म्हणुन जिंकलेले असतात. पण त्याचवेळी तुम्ही एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे, याचीही जाणिव यतकिंचीत तुम्हाला नसावी हीच खंत आहे.

Monday 6 March 2023

गवळी पिंपळी: मुलींना शिक्षणाचा मूलभूत हक्क देणारे गाव

'ताई, आमच्या गावचा जावई व्हायला मुलाला भाग्य काढावं लागतंय. असंच कोणालाही मुलगी देत नाही आम्ही आमची...' माझ्या समोर चहाचा कप धरत उभ्या असलेल्या मावशी ठसक्यात बोलल्या. अंगात साधी साडी, वय चाळिशीच्या जवळपास असेल. पुरुष मंडळी समोरच असल्याने डोक्यावरचा पदर ढळू न देण्याची गावाकडची पद्धत सांभाळत हळुवार पण आत्मविश्वासाने बोलत आमचा पाहुणचार करणारी ती बाई पाहून या असं का बोलताय म्हणून मी प्रश्नार्थक नजरेने गोंधळून त्यांच्याकडे बघितलं. त्यांना ते समजल्या सारखं त्यांनीच पुढे बोलणं सुरु ठेवलं... 'अहो, आमच्या गावातली लग्नाची मुलगी ही किमान पोस्ट ग्रॅज्युएशन तरी शिकतेच. त्यामुळे आजूबाजूच्या तालुक्यात आमच्या गावची मुलगी सून किंवा बायको म्हणून घरात यावी असं प्रत्येकाला वाटत. तालुक्याच्या शाळेचे मास्तर लोकंसुद्धा आमच्या गावच्या पोरींना शिकवायला उत्सुक असतात. आहेतच हुशार आमच्याकडच्या सगळ्या पोरी... एक वेळ आमचे पोरं शिकत नाहीत बघा, पण पोरी नाव काढता आमच्या शिक्षणात..त्यामुळे आम्हाला हुंडा सुध्दा जमवावा लागत नाही' असं बरच काही सांगत त्या पुढे कितीतरी वेळ भरभरून बोलत राहिल्या..
काही दिवसांपूर्वी जवळच्या मित्राच्या लग्नासाठी सोनपेठ तालुक्यातल्या गवळी पिंपळी गावात जाणं झालं. तेव्हाचा हा प्रकार. तालुक्यापासून ३-४ किलोमिटर आत जावं लागतं, गावात जायला दळणवळणाची सोय तर सोडाच पण रस्ताही नाही. फारतर २-२५० कुटुंबांची वस्ती आणि १२००-१३०० लोकसंख्या असलेलं हे गाव. त्यामुळे जिथे प्रत्येक कामासाठी या लोकांना सोनपेठ किंवा परभणी जवळ करावं लागतं त्या ठिकाणी मुलींच्या शिक्षणासाठी एवढा पुढाकार खरंच घेतला जात असेल का असं कुतुहल या मावशींच बोलणं ऐकुन कोणालाही वाटलं असतं. पण दिवसभरात गावातल्या इतर मंडळींशी बोलतांना समजलं की आपल्या मुलींनी खुप शिकावं म्हणून इथले पालक आग्रही आहेत. मी स्वत: अशाच छोट्या गावातून आलेली असल्याने आणि मुलींच्या शिक्षणाविषयी अशा अनेक छोट्या - छोट्या वाड्या वस्त्यांतले लोक किती उदासीन असतात हे खूप वेळा अनुभवून माहिती असल्याने मुलींना किमान शिक्षण घेण्याची मोकळीक दिलेली बघणं म्हणजे खरंच कौतुकास्पदच आहे. आजही माझ्याच बरोबरीच्या अभ्यासात हुशार असलेल्या कितीतरी मुलींचे लग्न त्यांची मर्जी विचारात न घेताच लावून दिले जातात. त्यातही मराठवाड्यात जिथे अजूनही बालविवाहासारख्या प्रथांबद्दल जनजागृती करण्याची कसरत प्रशासनाला घ्यावी लागते तिथे मुलींना शिक्षणासारख्या मुलभुत हक्काबद्दल एवढं स्वातंत्र्य मिळणं आजच्या जमान्यातही कौतुकाचंच आहे.
या मुली पुढे नोकरी करतात की नाही किंवा या शिक्षणाने त्यांच्यात स्वत:च्या हक्कांसाथी बोलण्याची हिंमत येते की नाही हा पुढचा भाग झाला. कारण आजही महिला दिन साजरा करतांना आपल्याला महिलांच्या प्राथमिक हक्कांविषयी बोलावं लागत असेल तर त्यानंतर येणार्‍या स्वातंत्र्याचा पल्ला गाठायला खूप काळ लोटावा लागणार आहे. तोवर मात्र आपल्याला महिला सबलीकरणात पुढाकार घेणार्‍या गवळी पिंपळी सारख्या अजून गावांची जास्त गरज आहे.