Sunday 17 May 2020

टिक-टॉक, पबजी व्हाया बेरोजगारी

 
लॉकडाऊनच्या निमित्ताने मागे काही दिवस वृत्तपत्रांची छपाई बंद ठेवण्यात आली आणि थोडे दिवस का होईना घरी निवांत राहण्याचा योग आला. मात्र हा घरात बसून राहण्याचा काळा तसा फारसा सुंदर, छान असा काही नव्हता... जवळ होती नव्हती ती पुस्तक वाचून झाली होती. थोडेफार बाकीचे कलाकुसरीचे छंद पण जोपासून झाले होते. पण काही दिवसातच वातावरणातल्या बदलाने, घामट कुंद हवेने अधिकच मरगळ यायला लागली. त्यामुळे एरवी फारसं कॉलनीमध्ये कोणाशी संबंधच न येणारी मी विरंगुळा म्हणून आजूबाजूच्या काही माझ्या सारख्या चोविशी-पंचवीशीतल्या आणि काही नुकत्याच पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या तरुण- तरुणींच्या जवळून संपर्कात आले. या काळात आत्ताच्या या माझ्यापेक्षा जास्त फास्ट अँड फॉरवर्ड पिढीचे विचार, त्यांची जीवनशैली जवळून अनुभवली. त्यात एरवी फक्त ऐकूनच माहीत असणाऱ्या टिक-टॉक, पबजी सारख्या अँप्सच अँडिक्शन या पिढीत केवढं खोलवर भिनलेलं आहे, हे पाहून हैराण झाले! कुठल्याशा जागेत उतरून लोकांना फक्त मारत सुटायचं आणि आपल्याला मारायला कोणी आलं तर मदतीसाठी खरोखरीच समोरच्याची मदत मागत ओरडायच! केवढा थिल्लर खेळ आहे हा.. मात्र हे सगळेच तरुण काही अशा थिल्लर अँप्सच्या आहारी गेलेले नाहीत हे बघून थोडं बरही वाटलं. 
मग असा कोणत्याच अँडिक्शनमध्ये नसणारा साधारण एकविशीतला "तो" एक एवढ्यात फारच गप्प आणि गंभीर दिसायला लागला तेव्हा त्याला नेमकं झालं तरी काय, हे जाणून घेण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यानेच माझ्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू केला! तेव्हा तरुण पिढीच भविष्य किती अंधारात गेलं आहे, याची जाणीव जास्त प्रखरतेने झाली.
मला वाटलं होतं त्यापेक्षा फार गंभीर आणि गहन प्रश्न होते त्याचे.. त्याच्या घरची परिस्थिती बेताचीच त्यामुळे आता डिग्री घेऊन लगेच नोकरीला लागायचं आणि घराचा भार उचलायचा, मग आपल्या पायावर उभं राहिलं की पुढचं शिक्षण घ्यायचं. अशी स्वप्न रंगवत असतानाच आता कोरोनामुळे आधीच आर्थिक मंदीचे सावट येऊन ठेपल्याने अनेकांच्या नोकर्‍यांवर गदा आलेली आहे. मग मला कोण नोकरी देणार? उमेदीच्या काळातच आता अशी गत झाली आहे तर माझ्या भविष्याचं काय होईल? अशा प्रश्नांच्या गर्तेत सापडलेला तो सैरभैर झाला होता. मात्र माझ्याकडे तरी कुठून त्याच्या या प्रश्नांची उत्तर असणार होती! खरंतर ही काय फक्त त्याचीच गोष्ट नाही त्याच्या सारख्या अनेकांना आज आपल्या भविष्याची चिंता सतावत असणार आहे.
तसं पाहिलं तर तुम्हाला, मला आणि मुळात भारतालाच बेरोजगारी हा विषय नवा नाही. पण लॉकडाऊनमुळे आता अर्थव्यवस्थेचा अधिकच बोजवारा वाजला असताना ज्यांच्या बळावर भारत महासत्ताक होऊ पाहत होता त्या तरुणांचेच भविष्य आता अधांतरी झाले आहे. एकीकडे ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे तरुणांचा एक वर्ग असाही आहे जो या लॉकडाऊनचा वेळ मोबाईलवर पबजी खेळण्यात आणि टिक-टॉकचे व्हिडिओ बनवण्यात घालवत आहे. या वर्गाला भविष्याची चिंता तर नाहीच, पण सध्याच्या परिस्थितीशी ही यांना घेणं देणं नाही. आपण भले, आपला पबजी भला असा जीवनमंत्र आत्मसात केल्यासारखे दिवस-रात्र मोबाईलमध्ये घुसून या खेळाला आणि अशा अँप्सलाच यांनी आपलं विश्व बनवल आहे. हा केवढा विरोधाभास म्हणायचा या पिढीचा !
आज ही तरुण पिढी टिक-टॉकवर वाढलेले आपले फॉलोवर्स बघून आनंदून जाते, त्यातून मिळणाऱ्या तोकड्या पैशांवर स्वतःला 'सेटल' समजते, पण उद्या बाहेरच्या खऱ्या जगात आपली काय किंमत होईल? आपल्याला आता निदान पोटापाण्यासाठी तरी काही काम मिळेल का? असे प्रश्न यांच्या गावीही नाहीत. पूर्वी आपला मुलगा वयात आल्यानंतर काही व्यसनांच्या आहारी तर जात नाही ना म्हणून पालक चिंतेत असायचे मात्र आताच्या पिढीला या अँप्सचं एवढं भयंकर व्यसन जडलं आहे की त्यापुढे त्यांना आपले आई-वडील काहीच आठवत नाही. कोणत्यातरी वेगळ्या जगात, वेगळ्या धुंदीत ते वावरत असतात आणि या सगळ्या परिस्थितीची जाणीव ज्यांना आहे... भविष्याचं कटू सत्य ज्यांना आत्ताच दिसायला लागलं आहे असा तरुणांचा जो एक गठ्ठा आहे तो दिवसेंदिवस अधिकच नैराश्याच्या गर्तेत जात आहे. भविष्याच्या चिंतेने त्यांना ग्रासलं आहे. या नैराश्यातून किंवा आपण आयुष्यात हवं ते साध्य करु शकलो नाही, म्हणून कोणी चुकीचं पाऊल उचललं तर याची जबाबदारी कोण घेईल? काळ सरकत जाईल तसं ही परिस्थिती बदलेलसुद्धा कदाचित, सगळं निट होईलही.. पण आज घडीला या तरुणांच्या अस्वस्थ मनाचे स्पंदनं थांबवत, त्यांना भविष्याची हामी कोण देईल? 

Saturday 7 March 2020

शक्तींचा विसर की पराक्रमाची गाथा

आज जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने प्रत्येकाला स्त्रियांच्या अस्तित्वाची जाणीव पुन्हा एकदा होईल आणि तिच्यावर औपचारिकता म्हणून शुभेच्छांचा वर्षाव केला जाईल. मग उद्या पुन्हा रात गई बात गई या उक्ती प्रमाणे सगळं पुढच्या एक वर्षासाठी शांत होईल. मग प्रश्न उरतो तो हा की फक्त एक दिवसच तिच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला का होते? जिच्याशिवाय पुरुषाचा पुरुषार्थच सिद्ध होऊ शकत नाही अशी 'ती' केवळ एका दिवसाची मोहताज असेल का? खरंतर प्रत्येक स्त्री ही इतकी स्वयंपूर्ण असते की आपल्यावर होणाऱ्या अत्त्याचाराविरुद्ध बंड पुकारण्याची ताकदसुद्धा तिच्यातच असते. पण जसा हनुमानाला आपल्यातल्या शक्तींचा विसर पडला होता तसाच विसर या स्त्रियांनाही पडला असला तरी प्रत्येकीच्या आयुष्यात याची आठवण करून देणारा जांबुवंत असतोच असे नाही. दिवसेंदिवस आपण बाईच बाईपणच नाकारतो आहे. एक मुलगी असण्यापेक्षा आपण तिला मुलासारखं घडवू बघतो आणि सगळा घोटाळा होतो. तिला एक स्त्री म्हणून जर आपण घडवू शकलो तर ती जास्त परिपूर्ण होऊ शकेल हे आपल्या लक्षातच येत नाही. आपला आत्मसन्मान जपण्यासाठी सीता भूमीत गडप झाली होती आणि आजही सगळ्या स्त्रिया या तिच्यासारख्याच आत्मसन्मान जपणाऱ्याच आहेत. म्हणजे आपण फक्त त्यांचा हा आत्मसन्मान कायम जागा ठेवायचे काम करायचे. बाकी तिची लढाई लढण्यासाठी ती सक्षम आहे आणि खरंतर स्त्रियांच आपण जितकं खच्चीकरण करू तेवढ्या अधिक त्या आत्मनिर्भर होण्याचा ध्यास घेतात. दुसरं असं की बायकांना पुरुष मागे ओढतात किंवा तिला दुय्यम वागणूक देतात हे काही अंशी खर असलं तरी स्त्रियांची खरी शत्रू ही दुसरी स्त्रीच असते नेहेमी. जे आपल्याला जमलं नाही जे आपण करू शकलो नाही तेच जर दुसरी एखादी बाई करत असेल तर तिच्या बद्दल वाईट बोलणं, तिला मागे ओढण्यासाठी प्रयत्न करणं हे सगळं बायकाच नाही का हो करत? पझेसिव्हीनेस आणि कॉम्प्लेक्स या स्त्रियांच्या गोष्टीच स्त्रियांना पुढे जाऊ देत नाही. त्यामुळे स्त्रियांनीच जर आधी इतर स्त्रियांना स्वातंत्र्य दिल तर मग आपण समाजासोबत आम्हाला स्वातंत्र्य द्याव म्हणून लढा देऊ शकू. त्यामुळे या महिलादिनाला पुरुषांपेक्षा स्त्रीवर्गाने संकल्प करावा की आम्ही एकमेकींचे पाय ओढायचे सोडून आमच्यातली एखादी का होईना पण पुढे कशी जाईल यासाठी प्रयत्नशील राहू.... आपला दिवस आहे तर सुरुवात आपल्यापासूनच करूया जग आपोआप बदलेल... 
बाकी जागतिक महिलादिनाच्या शुभेच्छा💐💐🙏🙏

©राखी राजपूत

Wednesday 8 January 2020

विद्यापीठ नावाच बेट

          समाजात वावरत असताना बरेच डॉक्टर्स आणि इंजिनिअर्स आपल्या आजूबाजूला असल्याचं मला जाणवलं तेव्हा या सगळ्या पेक्षा वेगळं शिक्षण घ्यायचं अस ठरवून पत्रकारितेला औरंगाबाद मधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेश घेतला आणि त्यावेळी अस लक्षात आल की डॉक्टर आणि इंजिनिअरची संख्या वाढत चालली आहे, अस जेव्हा मी समजत होते तेव्हाच यांच्या पेक्षा जास्त संख्या ही स्पर्धा-परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढली आहे हे इथे येऊन जाणवलं. असा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एक वेगळा वर्गच आता समाजात तयार होतो की काय असं इथल्या विद्यार्थ्यांना पाहून वाटायला लागलं.
             मागची चार वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यातपीठात शिकत असताना या विद्यापीठाला  समजून घेण्याचा योग तर आलाच तसच इथली विचारधारा कशी आहे हे सुद्धा फार जवळून बघायला मिळालं. हे सगळं अनुभवत असताना विद्यापीठात मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरीच आकर्षण विद्यार्थ्यांमध्ये दिसल. त्यामुळे इथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण फार मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मी मूळची नाशिक जिल्ह्यातली. आमच्या भागात फार तुरळकच हे असे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी दिसून येतात. त्यामुळे इथल्याच विद्यार्थ्यांमध्ये हे स्पर्धा परीक्षेचे एवढे आकर्षण का असेल असा प्रश्न आजवर कित्येक वेळा पडला आहे. 
           मुळातच मराठवाड्याला आणि इथल्या लोकांना आपल्या हक्कांसाठी कायम संघर्ष करावा लागलेला आहे. त्यातच दुष्काळ आणि त्यामुळे वर्षानुवर्षे पाचवीला पुजलेली गरिबी हे सगळं संपवण्यासाठी मग इथल्या तरुणांना सरकारी नोकरी करण्याचा मार्ग फार जवळचा वाटावा यात नवल काही नाही. आपल्याला सरकारी नोकरी लागली म्हणजे आपलं आयुष्य फार सुखाचं होईल अशी सुप्त भावना इथल्या प्रत्येक तरुणाच्या मनात असते. याच सगळ्या भावना मनात ठेवून जेव्हा हा तरुण या विद्यापीठात येतो तेव्हा त्याच्या भावनांना खत पाणी घालणारच वातावरण त्याला इथ बघायला मिळत. मोठी अभ्यासिका, सर्व पुस्तकांनी सुसज्ज ग्रंथालय आणि तिथे आधीपासूनच सरकारी नोकरी मिळविण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी. या सगळ्यामुळे बाहेरून नव्याने आलेल्या विद्यार्थ्याला आपण सुद्धा आपले नशीब आजमावून बघावे अशी इच्छा होतेच आणि आपल्याला सुद्धा सरकारी नोकरी लागेल, आपली सुद्धा सगळी स्वप्न पूर्ण होतील अशी स्वप्न रंगवण्यात तो मग्न होतो.  हा विचार बळावत जातो  आणि आता आपल्याला सरकारी नोकरी मिळणार या आनंदात हा तरुण दिवसातला दहा ते बारा तासांचा वेळ अभ्यासिकेत घालवतो. इथूनच खरतर त्याचा मृगजळाच्या दिशेने प्रवास सुरु होत असणार.
        बर या स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकरिशिवाय आपल्या आयुष्याला गत्यंतरच नाही, आपण त्या शिवाय आयुष्यात सेटलच होऊ शकत नाही अस इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनावर कोरलच गेलेलं आहे जस असच त्यांना पाहून आपल्याला वाटायला लागतं. याच नादात आपण आपल्या आयुष्यातील उमेदीची आणि कर्तृत्व गाजवून दाखवण्याची अनेक वर्ष घालवत आहोत हे सुद्धा बापड्यांच्या लक्षात येत नसेल का? एवढी वर्ष अभ्यास करून, तयारी करून सुद्धा जेव्हा या विद्यार्थ्यांच्या हाती अपयशच येत तेव्हा खरी फरपट सुरू होते. कारण सगळ्याच गोष्टींना मर्यादा आहे तशीच वयाची मर्यादा या परीक्षा देण्यासाठी सुद्धा आहेच. आपण यात पुरते अडकलो हे समजत तोवर दुसरीकडे नोकरी लागण्याचे पर्याय सुद्धा बंद झालेले असतात. अशावेळी एक तर असच एखाद्या स्पर्धा परीक्षेच्या क्लासवर शिक्षकाची नोकरी हे विद्यार्थी करतात किंवा मग याच विद्यापीठामध्ये आपल्या सारख्याच दुसऱ्या विद्यार्थ्यांसाठी कमी पैशांत किंवा फुकटच 'स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी' याविषयावर  व्याख्यान देत त्यांना मार्गदर्शन करायला सुरू करतात ही किती गंमत म्हणायची?  म्हणजे पुढच्याला ठेच मागचा शहाणा याच्या उलट पुढचाच मागच्याला आपल्या सोबत ओढण्यासाठी किती तत्पर आहे इथे याच हे उत्तम उदाहरण म्हणता येईल का?
           सरकारी नोकरी विषयीच्या या विद्यापीठामधल्या आकर्षणामागे एक घटक म्हणजे यात मिळणार आरक्षण सुद्धा असू शकत का असही आता वाटायला लागलं आहे. कारण हे आरक्षण खाजगी नोकरीच्या ठिकाणी थोडीच मिळणार आहे! तिथ स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे या ठिकाणचे विद्यार्थी खाजगी नोकरी विषयी फारसे उत्साही कधी नसतातच. आपलं काय नशीब आजमवायच ते सरकारी नोकरीमध्येच आजमावू अशी जणू पक्की खुणगाठच बांधलेली असते त्यांनी.
             या सगळ्या विषयावर एका मैत्रिणीने " आम्ही सारख या परीक्षा देत राहतो कारण पहिल्या वेळी आम्ही परीक्षेचे स्वरूप समजून घेतो आणि त्या नंतरच्या प्रत्येक वेळी आम्ही हळू हळू दर परीक्षेला आमचा अभ्यास वाढवतो, यामुळे कधी तरी आमची पोस्ट निघते." अशी प्रतिक्रिया दिली.  काहींनी तर मी सुद्धा सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला मला दिला.  स्पर्धा परीक्षा करूच नाही अस काही मी म्हणत नाही पण यात आयुष्यातला किती काळ घालवायचा हे आपणच ठरवायला नको का? प्रयत्नांती परमेश्वर अस जरी आपण म्हणत असलो तरी प्रयत्नांना यशच येत नाही अस जेव्हा समजत तेव्हा दुसरा मार्ग निवडण अधिक योग्य की लग्न झाल, मुलं झाली तरी आयुष्याची अशी फरपट करून घेत मृगजळाच्यामागे धावत रहाणं अधिक योग्य समजायचं?  या स्पर्धा परीक्षा म्हणजे एक प्रकारचा जुगारच असतो. त्यातही आता सरकार जिथ सगळेच कारभार डिजिटल आणि मनुष्य विरहित करण्याचे मनसुबे बांधत आहे, तिथ या जुगारापायी आपल पूर्ण आयुष्यच पणाला लावणाऱ्या या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आयुष्य म्हणजे काय फक्त सरकारी नोकरी नाही, हे कधी समजणार आहे? आता तर हे विद्यापीठ म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच बेटच झाल आहे की काय असं वाटायला लागलं आहे. दर वर्षी या बेटावर नवीन विद्यार्थी येत राहतात. पण इथून बाहेर जाणारे फारच कमी. तहानलेल हरीण ज्या प्रकारे मृगजळाच्या मागे धावत सुटत तशीच अवस्था इथल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांची आज झाली आहे. अजून किती वर्ष या विद्यापीठातला विद्यार्थी असं चकवा पडल्या सारख भरकटत राहणार याच उत्तर आता बहुतेक काळच देऊ शकेल अस वाटत.
                                                   
                                                 

'ती'चं अस्तित्व

                कुठल्याश्या मराठी चित्रपटाचा एक सिन इंटरनेटवर सर्फिंग करताना समोर आला. त्यात नायिका आरश्यासमोर उभी असते आणि तिच्या ब्राची पट्टी टॉपच्या बाहेर येऊन खांद्यावर स्पष्ट दिसत असते. त्याचवेळी मागून नायिकेची आई येऊन रागाने तिच्याकडे बघते आणि तिचा टॉप खसकन खांद्यावर ओढून ती पट्टी झाकते. बस एवढाच सिन. पण हाच क्षण मनात मात्र किती वेळा रिवाईंड झाला. त्याच्या बरोबरीने विचारांचं चक्रसुद्धा फिरायला लागलं. मग जाणवलं की जिथं बाईच शरीरच एवढं लपवून ठेवलं जातं आपल्याकडे तर तिथे तिच्या अंतरवस्त्रांची काय बात! आपल्या पारंपारिक संस्कृतीचा मोठा वारसा असलेल्या पुरुषप्रधान देशात बाईचा डोक्यावरचा पदर आणि छातीवरची ब्रेसीयर हे तीच चरित्र ठरवण्याचं प्रमाण बनलं आहे. त्यामुळे डोक्यावरचा पदर ढळला म्हणून किंवा खांद्यावर ब्लाउज किंवा टॉपच्या आतून ब्रेसीयरची पट्टी डोकावल्यावर बाईला चवचाल ठरवणारे महाभाग आपल्याकडे सर्रास बघायला मिळतात. मुख्य म्हणजे स्त्रियासुद्धा यात मागे नसतात ही किती गंमत आहे ना! 
                "स्त्री ही जन्मत नाही तर ती घडवली जाते" असं सिमोन दि बुवा जे म्हणते ते अशावेळी मला फार खरं वाटत. किती विचार करून स्त्रीला या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात बघा ना, की ती स्वतः एक बाई असून दुसऱ्या बाईच चरित्र तिच्या वागण्यावरून ठरवायला निघते. आपल्याकडे मुलगी वयात आली आणि तिच्या शरीरात विशिष्ट बदल दिसायला लागले की तिला तिची आई, आज्जी आणि अशाच इतर बायका वागणुकीचे धडे द्यायला लागतात. नीट बसायचं, हळू बोलायचं, हळू हसायचं, सैल फारशे अंग प्रदर्शन होणार नाही, असे कपडे घालायचे आणि आपले अंतरवस्त्र कोणाला दिसू द्यायचे नाही. जीन्स- टॉप घालायची मुभा जरी मिळाली असली तरी ब्राची पट्टी कोणाला दिसायला नको हे फार ठासून मुलींच्या मनावर बिंबवलं जातं. मग हे आपल्या एवढं डोक्यात बसतं की कधी चुकून जरी आपल्या ब्रेसीयरची पट्टी टॉपच्या बाहेर आली तर आपण एवढं ओशाळतो की आता धरणी फुटावी आणि आपण त्यात गायब होऊन जावं असं काही तरी फिलिंग मनात यायला लागतात. शिवाय आपल्या आजूबाजूच्या मुलीसुद्धा याच वातावरणात वाढलेल्या, त्यामुळे अस ब्राची पट्टी बाहेर डोकवायला लागली की हळूच खाणाखुणा करून एकमेकींना सतर्क केलं जातं आणि हेच जर गर्दीच्या ठिकाणी झालं तर आपल्या ब्राची पट्टी दिसतेय याची काळजी तिथे असलेल्या सगळ्याच बायकांना आणि मुलींना वाटायला लागते. मग कसंही करून कोडवर्ड मध्ये आपल्याला त्याबद्दल सांगितलं जातं. बर अशावेळी एखाद्या पुरुषाचं त्याकडे लक्ष गेलंच तर त्याची नजर त्या ब्राच्या पट्टीवरच खिळून राहिलीय हे जाणवत. असं का? आणि मुळातच हा खरंच एवढा बाऊ करण्याचा विषय आहे का? स्त्री असो वा पुरुष अंतरवस्त्र प्रत्येकजणच वापरत असतो. मग पुरुषाच्या बनियनचा का नसेल बर असं बाऊ होत? किंवा त्यांना का नाही कोणी सांगताना दिसत की बाबा तुझ्या बनियनचा पट्टा बाहेर आलाय बघ. 
            चित्रपटांमध्ये बिकिनी घालून नाचणारी नायिका आम्हाला फालतू, वाईट चालीची वाटते. पण त्याचवेळी शर्ट उतरवून बनियनवर नाचणाऱ्या नायकाला आम्ही 'माचो मॅन' चा टॅग लावतो ! म्हणजे बाईच शरीर, तिचे कपडे हे काय फक्त कामेच्छा जागृत करण्यासाठीचं साधन आहे का? त्या पलीकडे तीच काहीच अस्तित्वच नाही आपल्या नजरेत? अगदी स्वतः बाईच्या सुद्धा ! माझे अंतरवस्त्र माझ्या कापड्यांमधून दिसले तर मला कोणीतरी वाईट म्हणेल, माझ्या कॅरॅक्टरवर प्रश्न उभे करेल अशी भीती कायम मनात असते आपल्या प्रत्येकीच्या, माझ्या सुद्धा. असं का बरं व्हावं? एवढं का आपण या स्वतःला ब्रेसीयरच्या पट्टी सोबत बांधून घेतलंय?
                काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियामधल्या स्त्रियांनी हॅशटॅग #नोब्रा ही मोहीम राबवली होती. यात या स्त्रियांनी ब्रा न घालता सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आणि ब्रा न घालता रस्त्यावर सुद्धा उतरल्या होत्या. असं करताना त्यांना जाणवलं असेल का, की आपलं अस्तित्व हे आपलं शरीर, आपले स्तन आणि त्यावरच्या ब्रेसीयर पुरत नसून त्या पलीकडे आहे?  करण असं काही करायचं म्हणजे धाडसच दाखवावं लागतं आणि आपल्या देशात जोवर स्वतः बायकांनाच आपल्या अस्तित्वाची जाणीव होत नाही, तसच खांद्यावर रुळणाऱ्या ब्राच्या पट्टीसोबत त्या निसंकोच पणे वावरू शकत नाही, तोवर आपल्या समाजालासुद्धा "ती"च्या अस्तित्वाची जाणीव होणार नाही. मात्र तोपर्यंत स्वतःच्या शरीराला आणि अंतरवस्त्रांना लपवून ठेवण्याचा हा प्रवास असाच सुरू राहणार आहे.