Wednesday 8 January 2020

विद्यापीठ नावाच बेट

          समाजात वावरत असताना बरेच डॉक्टर्स आणि इंजिनिअर्स आपल्या आजूबाजूला असल्याचं मला जाणवलं तेव्हा या सगळ्या पेक्षा वेगळं शिक्षण घ्यायचं अस ठरवून पत्रकारितेला औरंगाबाद मधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेश घेतला आणि त्यावेळी अस लक्षात आल की डॉक्टर आणि इंजिनिअरची संख्या वाढत चालली आहे, अस जेव्हा मी समजत होते तेव्हाच यांच्या पेक्षा जास्त संख्या ही स्पर्धा-परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढली आहे हे इथे येऊन जाणवलं. असा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एक वेगळा वर्गच आता समाजात तयार होतो की काय असं इथल्या विद्यार्थ्यांना पाहून वाटायला लागलं.
             मागची चार वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यातपीठात शिकत असताना या विद्यापीठाला  समजून घेण्याचा योग तर आलाच तसच इथली विचारधारा कशी आहे हे सुद्धा फार जवळून बघायला मिळालं. हे सगळं अनुभवत असताना विद्यापीठात मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरीच आकर्षण विद्यार्थ्यांमध्ये दिसल. त्यामुळे इथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण फार मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मी मूळची नाशिक जिल्ह्यातली. आमच्या भागात फार तुरळकच हे असे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी दिसून येतात. त्यामुळे इथल्याच विद्यार्थ्यांमध्ये हे स्पर्धा परीक्षेचे एवढे आकर्षण का असेल असा प्रश्न आजवर कित्येक वेळा पडला आहे. 
           मुळातच मराठवाड्याला आणि इथल्या लोकांना आपल्या हक्कांसाठी कायम संघर्ष करावा लागलेला आहे. त्यातच दुष्काळ आणि त्यामुळे वर्षानुवर्षे पाचवीला पुजलेली गरिबी हे सगळं संपवण्यासाठी मग इथल्या तरुणांना सरकारी नोकरी करण्याचा मार्ग फार जवळचा वाटावा यात नवल काही नाही. आपल्याला सरकारी नोकरी लागली म्हणजे आपलं आयुष्य फार सुखाचं होईल अशी सुप्त भावना इथल्या प्रत्येक तरुणाच्या मनात असते. याच सगळ्या भावना मनात ठेवून जेव्हा हा तरुण या विद्यापीठात येतो तेव्हा त्याच्या भावनांना खत पाणी घालणारच वातावरण त्याला इथ बघायला मिळत. मोठी अभ्यासिका, सर्व पुस्तकांनी सुसज्ज ग्रंथालय आणि तिथे आधीपासूनच सरकारी नोकरी मिळविण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी. या सगळ्यामुळे बाहेरून नव्याने आलेल्या विद्यार्थ्याला आपण सुद्धा आपले नशीब आजमावून बघावे अशी इच्छा होतेच आणि आपल्याला सुद्धा सरकारी नोकरी लागेल, आपली सुद्धा सगळी स्वप्न पूर्ण होतील अशी स्वप्न रंगवण्यात तो मग्न होतो.  हा विचार बळावत जातो  आणि आता आपल्याला सरकारी नोकरी मिळणार या आनंदात हा तरुण दिवसातला दहा ते बारा तासांचा वेळ अभ्यासिकेत घालवतो. इथूनच खरतर त्याचा मृगजळाच्या दिशेने प्रवास सुरु होत असणार.
        बर या स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकरिशिवाय आपल्या आयुष्याला गत्यंतरच नाही, आपण त्या शिवाय आयुष्यात सेटलच होऊ शकत नाही अस इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनावर कोरलच गेलेलं आहे जस असच त्यांना पाहून आपल्याला वाटायला लागतं. याच नादात आपण आपल्या आयुष्यातील उमेदीची आणि कर्तृत्व गाजवून दाखवण्याची अनेक वर्ष घालवत आहोत हे सुद्धा बापड्यांच्या लक्षात येत नसेल का? एवढी वर्ष अभ्यास करून, तयारी करून सुद्धा जेव्हा या विद्यार्थ्यांच्या हाती अपयशच येत तेव्हा खरी फरपट सुरू होते. कारण सगळ्याच गोष्टींना मर्यादा आहे तशीच वयाची मर्यादा या परीक्षा देण्यासाठी सुद्धा आहेच. आपण यात पुरते अडकलो हे समजत तोवर दुसरीकडे नोकरी लागण्याचे पर्याय सुद्धा बंद झालेले असतात. अशावेळी एक तर असच एखाद्या स्पर्धा परीक्षेच्या क्लासवर शिक्षकाची नोकरी हे विद्यार्थी करतात किंवा मग याच विद्यापीठामध्ये आपल्या सारख्याच दुसऱ्या विद्यार्थ्यांसाठी कमी पैशांत किंवा फुकटच 'स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी' याविषयावर  व्याख्यान देत त्यांना मार्गदर्शन करायला सुरू करतात ही किती गंमत म्हणायची?  म्हणजे पुढच्याला ठेच मागचा शहाणा याच्या उलट पुढचाच मागच्याला आपल्या सोबत ओढण्यासाठी किती तत्पर आहे इथे याच हे उत्तम उदाहरण म्हणता येईल का?
           सरकारी नोकरी विषयीच्या या विद्यापीठामधल्या आकर्षणामागे एक घटक म्हणजे यात मिळणार आरक्षण सुद्धा असू शकत का असही आता वाटायला लागलं आहे. कारण हे आरक्षण खाजगी नोकरीच्या ठिकाणी थोडीच मिळणार आहे! तिथ स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे या ठिकाणचे विद्यार्थी खाजगी नोकरी विषयी फारसे उत्साही कधी नसतातच. आपलं काय नशीब आजमवायच ते सरकारी नोकरीमध्येच आजमावू अशी जणू पक्की खुणगाठच बांधलेली असते त्यांनी.
             या सगळ्या विषयावर एका मैत्रिणीने " आम्ही सारख या परीक्षा देत राहतो कारण पहिल्या वेळी आम्ही परीक्षेचे स्वरूप समजून घेतो आणि त्या नंतरच्या प्रत्येक वेळी आम्ही हळू हळू दर परीक्षेला आमचा अभ्यास वाढवतो, यामुळे कधी तरी आमची पोस्ट निघते." अशी प्रतिक्रिया दिली.  काहींनी तर मी सुद्धा सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला मला दिला.  स्पर्धा परीक्षा करूच नाही अस काही मी म्हणत नाही पण यात आयुष्यातला किती काळ घालवायचा हे आपणच ठरवायला नको का? प्रयत्नांती परमेश्वर अस जरी आपण म्हणत असलो तरी प्रयत्नांना यशच येत नाही अस जेव्हा समजत तेव्हा दुसरा मार्ग निवडण अधिक योग्य की लग्न झाल, मुलं झाली तरी आयुष्याची अशी फरपट करून घेत मृगजळाच्यामागे धावत रहाणं अधिक योग्य समजायचं?  या स्पर्धा परीक्षा म्हणजे एक प्रकारचा जुगारच असतो. त्यातही आता सरकार जिथ सगळेच कारभार डिजिटल आणि मनुष्य विरहित करण्याचे मनसुबे बांधत आहे, तिथ या जुगारापायी आपल पूर्ण आयुष्यच पणाला लावणाऱ्या या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आयुष्य म्हणजे काय फक्त सरकारी नोकरी नाही, हे कधी समजणार आहे? आता तर हे विद्यापीठ म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच बेटच झाल आहे की काय असं वाटायला लागलं आहे. दर वर्षी या बेटावर नवीन विद्यार्थी येत राहतात. पण इथून बाहेर जाणारे फारच कमी. तहानलेल हरीण ज्या प्रकारे मृगजळाच्या मागे धावत सुटत तशीच अवस्था इथल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांची आज झाली आहे. अजून किती वर्ष या विद्यापीठातला विद्यार्थी असं चकवा पडल्या सारख भरकटत राहणार याच उत्तर आता बहुतेक काळच देऊ शकेल अस वाटत.
                                                   
                                                 

No comments:

Post a Comment