Tuesday 20 November 2012

"चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद "

    अस म्हणतात कि पुस्तक वाचन म्हणजे एक व्यसनच असत. कारण एकदा कि पुस्तक वाचायची गोडी आपल्याला लागली तर मग स्वतःला या गोडीपासून लांब ठेवताच येत नाही.
                ग्रामीण भागात खर तर पुस्तक वाचनाबाबत , ती खरेदी करण्याबाबत खूप उदासीनता दिसून येते. वाचनालयाकडे तर कोणी फिरकतसुद्धा नाही.
               मी अशाच ग्रामीण भागात वाढलेली मुलगी.आई बाबा दोघ नोकरी करणारे, त्यामुळे नेहमी एकट रहाव लागायचं. अशातच पुस्तक वाचायची गोडी लागली आणि हळूहळू पुस्तकांशी मैत्रीच झाली. शाळेतील आणि महाविद्यालयातील मराठीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक पाठाच्या वर संदर्भ दिलेला असायचा, त्यावरूनही बरीचशी पुस्तकांची माहिती मिळायची.ती पुस्तक आपल्याकडे हवीशी वाटायची.आमच्या गावात चांगली पुस्तक वाचायला मिळण खरतर कठीणच. आणि शहराशी संपर्क नसल्याने चांगली पुस्तक वाचायला भेटायची नाहीत. पण गावातल्या वाचनालयात मिळाली तेवढी चांगली पुस्तक मी वाचून काढली.
                गावात वर्षानुवर्ष पुस्तक प्रदर्शन भरत नाही. माझ्या पाहण्यात गावात फक्त दोनदाच पुस्तक प्रदर्शन भरलय. मागच्या वर्षी भरलेलं पुस्तक प्रदर्शन हे चांगली पुस्तक खरेदी करण्याची सुवर्णसंधीच होती माझ्यासाठी.या प्रदर्शनातून मी काही चांगल्या लेखकांची नावाजलेली पुस्तक घेतली.मारुती चितमपल्ली याचं 'चकवा चांदण',उत्तम कांबळेंच  'आई समजून घेताना',अब्दुल कलाम याचं 'अग्निपंख',डौं.नरेंद्र जाधवांचं 'आमचा बाप आणि आम्ही'...यासारखी बरीच पुस्तक घेतली. सगळीच पुस्तक अप्रतिम आहेत, पण मला सगळ्यात जास्त आवडलेलं पुस्तक म्हणजे मारुती चितमपल्ली याचं 'चकवा चांदण-एक वानोपानिषद '.
                 हे पुस्तक म्हणजे चितमपल्ली याचं आत्मकथन आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असलेल घुबडाच चित्र पाहिलं कि पहिला प्रश्न आपल्या मनात येतो तो म्हणजे पुस्तकच नाव इतक सुंदर काव्यमय आहे तर मग चित्र घुबडाच का? पण आपल्या या प्रश्नाला लेखकाने खरच खूप छान उत्तर दिलय-रानावनात राहणारे पारधी, आदिवासी घुबडाला 'चकवा चांदणं ' म्हणतात. त्यांच्या मते हा अभद्र पक्षी सांजेच्या वेळी ओरडून त्यांची दिशाभूल करतो.अशावेळी हे आदिवासी  जंगलात जिथे असतील तिथेच  बसून राहतात.त्यांना चकवा पडतो.पण अभाळात शुक्राची चांदणी दिसू लागताच हा चकवा निघून जातो आणि आदिवासींना वाट सापडते,म्हणून घुबडाला ते 'चकवा चांदण' अस म्हणतात.
                  या पुस्तकात लेखकाने आपले अरण्य अनुभव सांगितले आहेत. रानावनातल्या आपल्याला माहित नसलेल्या आणि चक्रावून टाकणाऱ्या अनेक गोष्टी यात सांगितलेल्या आहेत. हे पुस्तक आवडण्याचे असे एक कारण सांगता येणार नाही, कारण लेखकाने त्यांचे जे अनुभव यात सांगितले आहेत ते इतके सुंदरपणे वर्णन केले आहेत कि ते वाचताना आपल्यासमोर जिवंतपणे उभे राहतात.आणि आपण प्रत्यक्ष त्यांच्या सोबत जंगलात भटकंती करतोय असे वाटते.
                   त्यांच्या शालेय जीवनाचा प्रवास आणि महाविद्यालयात घेतलेल्या विज्ञान शाखेकडून ते वनाभ्यासाकडे कसे वळले, या सगळ्या शिक्षणात त्यांना भेटलेले सहाध्यायी आणि त्यांच्या शिक्षकांचे वर्णनही असेच सुंदर रीतीने मांडलेय.
                    लेखकाचे आई वडील ,इतर नातेवाईक आणि समाज बांधव यांचे संबंध ,त्यांच्यासोबत लेखकाला आलेले अनुभव त्यांनी संकुचित वृत्तीने लपवून न ठेवता तेही खुलेपणाने सांगितले आहेत. त्यामुळे आपल्याला एका वेगळ्या समाजाची ओळख होते.
                   डॉ. सलीम आली सारखे पक्षीनिरीक्षक,चित्रकार ए. ए. आलमेलकर,बाबा आमटे,गो. नि. दांडेकर,गंगाधर गाडगीळ,व्यंकटेश माडगुळकर, जि. ए. कुलकर्णी या सर्वांसोबतचे चितमपल्ली यांचे अनुभवही या पुस्तकाचे वाचन मुल्य वाढवतात.किती सहजतेने त्यांना या महान व्यक्तींचा सहवास लाभला,याचे वर्णन वाचताना मन भारावून जाते.
                   वानविभागाबाबत  आणि एकूणच जंगलान बाबत अनेकांना आवड नसते. पण हे पुस्तक वाचताना आपण जंगल सफारीचा आनंद लुटू शकतो तसाच गड दुर्गांचाही आनंद लुटू शकतो.त्यामुळे एकदा हे पुस्तक वाचायला सुरु केल्यावर त्याचा फडशा पडल्याशिवाय राहवले जात नाही आणि घरबसल्या वन भ्रमंतीचा एक सुंदर अनुभवही मिळतो.
                   पुस्तकाची किमत थोडी जास्त वाटू शकते पण पुस्तक वाचल्यावर आपल्या विचारातील (किमतीचा) ठीतेपणा जाणवतो.सर्वच वयातील वाचकांनी वाचावे असे आणि आपल्या संग्रहात असावे असे हे पुस्तक तुम्हालाही नक्कीच आवडेल अशी अशा करते...

No comments:

Post a Comment